पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय र

संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर (Instagram) फ्रंट कॅमेऱ्याने शूट करून व्हिडीओ (Videos) पोस्ट केले. यामध्ये त्यांनी पेपर लीक प्रकरणात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली तसेच पहिल्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल युझर्सचे आभार मानले. याशिवाय, शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत त्यांनी तरुण पिढीपर्यंत (Gen-Z) पोहोचण्यासाठी आपल्या सहकारी मंत्र्यांनाही ‘रील्स’ (Reels) तयार करून सरकारच्या योजनांचा प्रसार करण्याचा सल्ला दिला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, “जंतर-मंतरची जी लढाई आहे ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने मुलांकडून लढली जात आहे. ज्या पद्धतीने इराणने इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं, त्या पद्धतीने जंतर-मंतरवरील जेन झी मुलांनी मोदी आणि त्यांच्या सायबर सेल, आयटी सेलला उद्ध्वस्त करून टाकले आहे. त्यामुळे मंत्र्यांना सूचना केली की, इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा. मग मंत्र्यांनी कामं कधी करायची? धर्मेंद्र प्रधानांनी कामं कधी करायची? इतर काही अमित शाहांसारखे अर्धशिक्षित मंत्री आहेत. स्वतः मोदी अर्धशिक्षित आहेत, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवत आहे? या सर्व गोष्टी एका भीतीतून निर्माण झालेल्या आहेत,” असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

संजय राऊत वर पंतप्रधान नरेंद्र मोदी: ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत

संजय राऊत पुढे म्हणाले की, जंतर-मंतरवरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही. ते गोंधळलेले आहेत. त्यांचा आता मेंदू चालत नाही. त्यांचा चेहरा सुजलेला आहे. त्यांची झोप उडालेली आहे. इतका गोंधळलेल्या पंतप्रधानांनी खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल. त्यांच्यापासून देशाला धोका आहे,” अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीसांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील हा व्हिजनरी निर्णय

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा परिणाम राज्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, काल एक बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली की, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. त्यांना अचानक अशी सुरक्षा का वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना वाय प्लस, झेड अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड ठेवले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचा तुम्ही ताफा बघाल, तर इतका मोठा ताफा पंतप्रधानांचा किंवा अमित शाहांचा देखील नाही. तरीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील हा व्हिजनरी निर्णय आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: गद्दार मंत्र्यांनी कोणताही धोका पत्करू नये

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील वातावरण अत्यंत बिघडलेले आहे. सरकारविरोधी वातावरण आहे. सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना पदोपदी धोका आहे. त्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार, खासदारांनीसुद्धा शहाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये. उगाचच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे. लाल बावटा दाखवला आहे. वादळाशी खेळू नका. विशेषतः जे गद्दार मंत्री, खासदार, आमदार आहेत, त्यांनी तर कोणताही धोका पत्करू नये. लोकांच्या नजरेतसुद्धा त्यांनी पडू नये. फार गंभीर परिस्थिती आहे. वातावरण चिघळले आहे. मी मानवतेच्या भावनेने हे सांगत आहे. काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तो चांगला आहे. अजून त्यांच्या सुरक्षेसाठी आर्मी वगैरे आणता आली, तर केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केली आहे, जनतेशी बेईमानी केली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी गृहमंत्री म्हणून मंत्री, आमदार, खासदार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचे मी स्वागत करतो, असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Chandrakant Patil on Neet Exam: ‘आंबा चोरला म्हणून फाशीची शिक्षा द्यायची नसते’; पेपरफुटीवरून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले…

Comments are closed.