घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे
शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ संजय शिरसाट: कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ठोस मदत द्यावी आणि तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा नववा दिवस असताना, संबंधित व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या निवासस्थानी जाऊन उपोषण मागे घेतल्याची अजब घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेण्यास वेळ का काढला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आता संजय शिरसाट यांनी घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
संजय शिरसाट म्हणाले की, असे समजण्याचे काही कारण नाही. मी त्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मुंबईवरून इकडे आलो आणि उपोषणकर्त्याचे वडील हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांनी इच्छा व्यक्त केली की, मला त्यांच्या हातून उपोषण सोडायचे आहे. तहसीलदारांना त्यांनी आग्रह केला. तेव्हा तहसीलदारांनी आपण जाऊया, असे म्हटले. त्यामुळे ते माझ्याकडे आले. त्यांच्या पत्नी, त्यांच्या वहिनी आणि आमचे कार्यकर्ते तिथे सोबत होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही त्यांना तासभर येथे बसवले. सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि त्यांचे उपोषण सोडवले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एखाद्या शेतकऱ्याने म्हटले की, मला पालकमंत्र्यांना भेटायचे आहे तर त्याला नाही कसे म्हणणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Sanjay Shirsat on Farmer Protest: विरोध करण्याचे काही कारण नाही
तुम्हाला का वाटले नाही की तुम्ही तिकडे उपोषण स्थळी भेट द्यावी, असे विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, त्यांनी मागणी केली म्हणून मी त्यांनी बोलवले. त्यांचे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू होते, त्यांना चक्कर येत होत्या. त्यांना तातडीने इकडे आणणं गरजेचं होते. इकडे आणल्यानंतर त्यांच्या तब्येतीचे काळजी घेणे हे देखील माझे काम होते. त्यामुळे त्या अँगलने मी तिकडे पाहिले. माझा जाण्याचा वेळ आणि त्यांचा येण्याचा वेळ हा समांतर होता. त्यामुळे त्यांना बोलवून घेतले, याला विरोध करण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Shirsat on Farmer Protest: नाही वाटत, नाही वाटत, नाही वाटत…
तुमच्या पीएने उपोषणकर्त्यांना सांगितले की, साहेबांना वेळ नाही. त्यामुळे तुम्ही इकडे, या अशी माहिती समोर आली. याबाबत विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले की, असे काहीही नाही. माझे सगळे कार्यक्रम होते ते आल्यानंतर एक तास इकडे बसले होते. माझं त्यांच्याशी चांगलं बोलणं झालेलं आहे. यात कोणताही वाद होण्याचे काहीही कारण नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्हाला हे असंवेदनशील वाटते का? असे विचारले असता नाही वाटत. तुम्हाला खेद वाटतो का? याबाबत विचारले असता नाही वाटत. चूक झाली असे वाटते का? नाही वाटत, जे घडलं नाही त्यात संवेदनशीलता कुठून आली, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले.
Sanjay Shirsat on Farmer Protest: विरोधकांना टीका करू द्या
तुमच्या कृतीला विरोधकांकडून टीका होत आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, विरोधकांना टीका करू द्या. आम्ही काय मदत करतो हे आमच्या मनाला माहिती आहे. आमच्या जीवाला माहित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वात जास्त आक्रमक आम्ही असतो. हे विरोधक काय करतात तो त्यांचा भाग आहे. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. शेतकरी माझा आहे. शेतकऱ्यांसाठी काय करायचे ते मी करतो, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.