Sonam Wangchuk | सोनम वांगचुक यांचे उपोषण समाप्त 26 दिवसांनंतर केंद्रीय मंत्री नड्डा यांच्या हस्ते रस पिऊन सांगता
► वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि नेते सोनम वांगचुक यांनी त्यांचे 26 दिवस चाललेले उपोषण समाप्त केले आहे. गुरुवार आणि शुक्रवार यांच्यातील मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते रस प्राशन करून उपोषणाची सांगता केली. त्यानंतर त्यांनी सूपचेही प्राशन केले. आंदोलनात हिंसाचार होऊ नये.
तसेच हे आंदोलन शांततेच्याच मार्गाने चालले पाहिजे, यासाठी उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या या निर्णयामुळे देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
‘नीट-युजी’ परीक्षेत घडलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रश्नावरून दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलकांनी आंदोलन चालविले आहे. वांगचुक या आंदोलाशी जोडले गेले आहेत. 28 जूनपासून त्यांनी अमर्यादकालीन उपोषणाला प्रारंभ केला.
त्यानंतर 18 दिवसांनी प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. नंतर उच्च न्यायालयाच्याच आदेशावरून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले. तेथेच त्यांनी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता आपल्या उपोषणाची सांगता केली. यावेळी केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्यासह वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि लडाख नागरी सभेचे नेते रुग्णालयात उपस्थित होते. त्यांचे हे उपोषण 26 दिवस चालले होते.
तीन अटी
वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी ठेवल्या होत्या. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कायदेशीर किंवा कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाऊ नये. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र घेण्यावर विचार व्हावा आणि नीट परीक्षेच्या कारणास्तव आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1 कोटी रुपये हानीभरपाई द्यावी, अशा या मागण्या आहेत.
राजीनाम्याची मागणी सौम्य
प्रथम, वांगचुक यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी ठाम मागणी केली होती. तथापि, चार दिवसांपूर्वी त्यांनी या मागणीत काहीसा सौम्यपणा आणला होता. प्रधान यांच्या राजीनाम्यावर विचार केला जावा, असे परिवर्तन त्यांनी आपल्या मागणीत केले होते. केंद्र सरकारने त्यांच्याशी चर्चा केली होती. अखेर ही चर्चा सफल झाली असून त्यांनी उपोषण सोडले आहे.
राजकीय पक्षांशी अनेकदा चर्चा
आपला उपोषण सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारशी प्रदीर्घ आणि सातत्यपूर्ण चर्चा करून आपण घेतला आहे. शिक्षण पद्धतीत आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. परीक्षा पद्धतीतील अनुचित प्रकारांना त्वरित आळा घालण्याची आवश्यकता आहे. या सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय मी घेतला, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. विविध पक्षाच्या 65 खासदारांनी आपली भेट घेऊन, किंवा आपल्याशी संपर्क करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे.
काँग्रेसचा आरोप
सोनम वांगचुक यांनी भारतीय जनता पक्षाशी आणि केंद्र सरकारशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्यात काही ‘व्यवहार’ झाला असून त्यामुळे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे इम्रान मसूद यांनी केला आहे. वांगचुक अण्णा हजारे यांच्यासारखेच वागत आहेत. 2012 मध्ये हजारे यांनी 12 दिवसांनंतर उपोषण थांबविले होते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांचा भावूक संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. आपण आता आपल्या प्रकृतीच्या सुधारणेकडे लक्ष द्यावे. उपोषणामुळे कमी झालेले आपले वजन पुन्हा पूर्ववत व्हावे. आता आपण डॉक्टरांच्या सूचनांच्या अनुसार आपल्या प्रकृतीची निगा राखावी. आपली प्रकृती लवकरात लवकर पूर्वीसारखी होवो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना मी करतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनम वांगचुक यांना संदेश पाठविला आहे.
Comments are closed.