IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही

मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून, 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत (Points Table) मुंबईने नवव्या स्थानावर आपला प्रवास संपवला, सलग सहाव्या वर्षीही किताब हुकल्यामुळे संघात मोठ्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल इतिहासातील आजवरची सगळ्यात मोठी ट्रेड डील लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचे (MI) दोन सर्वात मोठे आधारस्तंभ हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर संघाने आपला नवा कर्णधारही निश्चित केल्याची चर्चा आहे.

मुंबई इंडियन्समध्ये मोठे फेरबदल का?

गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. आयपीएल 2026 च्या हंगामातही मुंबईला प्ले-ऑफ शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडण्याची नामुष्की सहन करावी लागली होती. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या या संघाच्या अशा कामगिरीमुळे फ्रँचायझीचे व्यवस्थापन कमालीचे नाराज आहे. त्यामुळेच आता आगामी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स आपल्या संघात बदल करून एक नवा, तरुण आणि आक्रमक संघ तयार करण्याच्या तयारीत आहे.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव संघ सोडणार?

सोशल मीडियावर आणि क्रीडा वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे हार्दिक आणि सूर्याचे मुंबई इंडियन्सशी बिनसले आहे. रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही स्टार खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला अनफॉलो केले असून, आपल्या प्रोफाईलवरून संघासंबधीच्या जुन्या पोस्ट्सही डिलीट केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, हार्दिकला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. तर नुकतेच भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद गमावलेला सूर्यकुमार यादव लखनौ सुपर जायंट्स (LSG) किंवा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये सामील होऊ शकतो.

मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण?

मुंबई इंडियन्सचा तरुण आणि भरवशाचा फलंदाज तिलक वर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने कठीण प्रसंगात अनेक मॅच-विनिंग खेळी खेळल्या आहेत. व्यवस्थापनाचा एक गट तिलकला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करत असून, त्याला थेट नेतृत्व सोपवले जाऊ शकते. दुसरीकडे, जर ट्रेड यशस्वी झाला, तर मुंबई इंडियन्स भारतीय टी-20 संघाचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. श्रेयस अय्यरने यापूर्वी केकेआरला चॅम्पियन बनवले आहे आणि पंजाब किंग्सलाही फायनलपर्यंत नेले आहे. तो मुंबईचाच स्थानिक खेळाडू असल्याने मुंबई इंडियन्ससाठी तो कर्णधार आणि मध्यक्रमातील मजबूत फलंदाज म्हणून सर्वात उत्तम पर्याय ठरेल.

हे ही वाचा –

Shreyas Iyer India T20 Captain Statement : टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले

Comments are closed.