माहेराहून 50 लाख घेऊन ये, सातत्याने छळ, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेच्या छळाची हादरवणारी घटना
सोलापूर : राज्यात हुंडाबंदी कायदा असतानाही आजही मुलीच्या वडिलांनी लग्नात (Marraige) मोठ्या रकमेसह दागदागिने आणि संसारपयोगी वस्तू भेट म्हणून नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांना द्याव्याच लागतात हे वास्तव आहे. मात्र, मुलीच्या वडिलांना सर्वकाही देऊनही पुन्हा सासरी गेल्यानंतर मुलीचा छळ केला जाता. देशाला अध्यात्म आणि भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुरात हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योग-व्यवसायासाठी माहेरहून 50 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पंढरपुरातील (Pandharpur) प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच, पीडित महिलेनंही सासरच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची माहिती दिली.
पंढरपुरात विवाहित महिलेवर घटस्फोट साठी दबाव टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, पीडित विवाहिता तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत 50 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी शिंदे नाईक कुटुंबाने छळ केल्याचा आरोप आहे. सोलापूर मधील ऐश्वर्या श्रीमान हिचा विवाह 2017 मध्ये पंढरपूर मधील रोहन शिंदे नाईक सोबत झाला. शिंदे नाईक कुटुंबाने विविध व्यवसाय करण्यासाठी ऐश्वर्या हिला माहेरहून 50 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार शारीरिक मानसिक छळ केला. तिने रक्कम न आणल्याने तिला मूल होऊ दिले नाही, मूल झाले तर संपत्तीत वारस होईल, असेही संबंधित कुटुंबीय म्हणायचे.
विशेष म्हणजे, सासरच्या छळाला कंटाळून ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी विवाह केला. घटस्फोट न होताच सदर विवाह केला असून रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल यांच्यासह कुटुंबाने माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी, आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिल्याचा आरोप पीडित विवाहिता ऐश्वर्याने केला आहे.
वडिलांनी लग्नात 25 तोळं सोनं, अडीच किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपडे, व्हिडिओ शुटींगसाठी दिले होते. लग्नानंतर 8-9 महिने माझा संसार नीट सुरू होता. मात्र, नंतर, त्यांच्या विविध उद्योगासाठी, पेट्रोल पंपासाठी, रोड काँट्रॅक्टसाठी 50 लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. तसेच, पैसे न आणल्यास मूल न होऊ देण्याचा दबाव आणला. दरम्यान, पंढरपूर शहर पोलिसात पीडित विवाहितेचा पती, दीर नगरसेवक राहुल सह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप राजकीय दबावापोटी कोणालाही अटक झाली नाही, असेही पीडिताने म्हटले. तसेच, आम्हाला न्याया द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.