गद्दारीची कीड महाराष्ट्र पोखरतेय, त्या किडेला वेळेत चिरडले नाही तर महाराष्ट्र, देश वाचणार नाही; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
“आता वरवरच्या उपायोजना करून चालणार नाही. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत बसला असून मिंधे सेनेचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून पाडले पाहिजे. गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरतेय. त्या किडेला वेळेत चिरडले नाही, तर महाराष्ट्र, देश वाचणार नाही”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वाशीम-यवतमाळ, हिंगोली मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्यात गद्दारांवर तोफ डागल्यानंतर उद्धव ठाकरे रविवारी परभणी आणि धाराशीव येथे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी गद्दारांसह भारतीय जनता पक्षावरही जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे. परभणीकरांनी शिवसेनेचा महापौर दिलेला आहे, त्याबद्दल मला त्यांना धन्यवादही द्यायचे आहेत. कालपासून कार्यकर्त्यांच्या बैठका होत असून लोकसभेला ज्यांनी शिवसेनेच्या, महाविकास आघाडीच्या खासदारांना मतदान करून विजयी केले त्या सगळ्यांची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. काही गोष्टींना एक विचित्र पार्श्वभूमी असते तशी परभणी आणि हिंगोलीला आहे. इथून जे निवडून दिले जातात, ते कालांतराने गद्दारी करतात. तरीही इथले शिवसैनिक आणि मतदार कायम शिवसेनेसोबत राहिलेले आहेत. मला खात्री आहे ते यापुढेही राहतील.”
Comments are closed.