त्याला माहीत नाही मी विकेट टेकर..’, वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीत 2 विकेट घेतल्यावर केला मोठा खुलासा!

दुलीप ट्रॉफीचा (Dulip trophy) पहिला क्वार्टर फायनल सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इशान किशनच्या (Ishaan kishan) नेतृत्वाखालील ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा एक डाव आणि 210 धावांनी पराभव करून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केले.

या सामन्यात ईस्ट झोनचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) फलंदाजीत काही विशेष कमाल दाखवू शकला नाही, पण त्याने गोलंदाजीत दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यानंतर वैभवने आपल्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले आणि कोणत्या रणनीतीखाली आपण दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या, हे सांगितले.

वैभव सूर्यवंशीबाबत बीसीसीआयने (BCCI) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैभवने सांगितले की, या सामन्यात एका वेळी विरोधी संघाची विकेट पडत नव्हती, अशा स्थितीत त्याला 2-3 षटके गोलंदाजी करण्यास सांगण्यात आले. इशान भैय्याला असे वाटले होते की तो मला गोलंदाजी देऊन धोका पत्करत आहे, पण त्याला माहीत नव्हते की मी विकेट टेकर आहे. त्या वेळी माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता की, मी पाच विकेट घेतल्या तरी मला 3 षटकेच मिळणार आहेत. त्यामुळे मला या 3 षटकांत योग्य लाईन आणि लेन्थवर चांगली गोलंदाजी करायची आहे.

15 वर्षांचा वैभव पुढे म्हणाला की, गोलंदाजीत विकेट घेऊन खूप मजा आली कारण या सामन्यात फलंदाजीत माझी कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. त्यामुळे गोलंदाजीत संघासाठी योगदान देऊन खूप छान वाटले. जर एखाद्या फलंदाजाला विकेट मिळाली, तर त्याचा आनंद वेगळाच असतो. तो पुढे म्हणाला की, कोणत्याही फलंदाजाला विचाराल तर त्याला गोलंदाजी करण्यात मजा येते आणि त्याचप्रमाणे गोलंदाजांनाही फलंदाजी करायला आवडते. दोघांनाही तितकाच आनंद होतो.

दुलीप ट्रॉफी 2026 ची सेमीफायनल 30 ऑगस्टपासून बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये (COE) खेळवली जाईल. पहिल्या सेमीफायनलमध्ये ईस्ट झोनचा सामना सेंट्रल झोनशी होणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये साउथ झोनचा संघ नॉर्थ झोनचा सामना करेल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष पहिल्या सेमीफायनलमधील वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. या सामन्यात तो बॅटने मोठी खेळी करून संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. क्वार्टर फायनलमध्ये तो फक्त 8 धावा करून बाद झाला होता.

Comments are closed.