Fact Check – विराट कोहली याने IPL 2026 दरम्यान लंडनहून येण्या-जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची मागणी केली?
इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामाला सुरुवात होण्यास सहा दिवसांचा अवधी बाकी आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात 27 मार्चला सलामीचा सामना खेळला जाणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आरसीबीचा स्टार बॅटर विराट कोहली याच्याबाबत एक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाली. आयपीएल दरम्यान विराट कोहली याने लंडनला ये-जा करण्यासाठी खास चार्टर्ड फ्लाईट मागितल्याचा दावा या न्यूजमधून करण्यात आला होता. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे विराट कोहली याने स्पष्ट केले आहे.
विराट कोहली याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका न्यूज पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, विराटने आरसीबी मॅनेजमेंटकडे हिंदुस्थान आणि लंडन दरम्यान चार्टर्ड फ्लाईटची मागणी केली आहे. बातमीत पुढे म्हटले होते की, जर दोन सामन्यांमध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त अंतर असेल तर विराटला लंडनला जाऊन पुढच्या सामन्याच्या आधी परत यायचे आहे. विराटने या पोस्टवर दोन हसणारे इमोजी टाकून हे स्पष्ट केले सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी पूर्णपणे बिनबुडाची आहे.
दरम्यान, अनेकदा स्टार क्रिकेटपटूंच्या नावाचा वापर करून ‘क्लिकबेट’ बातम्या चालवल्या जातात. यामुळे या खेळाडूंना ट्रोलही केले जाते. मात्र यावेळी विराट कोहली याने ही फेक न्यूज अधिक व्हायरल होऊ दिली नाही आणि त्याची बाजू स्पष्टपणे मांडली. विराटने या पोस्टचा फोटो शेअर करत फक्त दोन हसणारे ईमोजी शेअर केले आहेत. एकही शब्द न वापरता त्याने ही अफवा खोडून काढली.
विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी 😂🔥 pic.twitter.com/x4sTQ8PFSn
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 22 मार्च 2026
18 वर्षात पहिल्यांदा विजेतेपद
आरसीबीने गेल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. आयपीएलच्या 18 वर्षांच्या काळात आरसीबीने पहिल्यांदाच चषक जिंकला. मात्र या विजयाला बंगळुरूमध्ये गालबोट लागले आणि चिन्नास्वामी मैदानावर आयोजित विजयी सोहळ्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक चाहत्यांचा मृत्यू झाला. हे सर्व विसरून यंदा आरसीबीच्या संघाला मैदानात उतरावे लागणार आहे.
आयपीएलमधील कामगिरी
विराट कोहली याने आयपीएलमध्ये 267 सामने खेळले आहेत. यात त्याने 259 डावात फलंदाजी करताना 8661 धावा केल्या आहेत. नाबाद 113 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटने आयलीएलमध्ये 8 शतक आणि 63 अर्धशतक ठोकलेले आहेत.
Comments are closed.