वर्ल्ड कपचा अल्टिमेट क्लायमॅक्स! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला धोपटले, इकडे भारताच्या काळजाचा ठो
दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेश महिला T20 विश्वचषक 2026 वर विजय : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. ग्रुप-1 मधील दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्याच्या निकालाने भारताचे टेन्शन वाढवले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर विजय मिळवल्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘करो या मरो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा विजय, भारताला मोठा धक्का
या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 118 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 4 गडी आणि 4 चेंडू राखून यशस्वीपणे गाठले. भारताला उपांत्य फेरीतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव होणे गरजेचे होते. मात्र, आफ्रिकेने सामना जिंकल्यामुळे भारताचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे.
पॉइंट्स टेबलमधील समीकरण
बांगलादेशला धूळ चारून दक्षिण आफ्रिकेने 8 गुणांसह ग्रुप-1 च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, भारतीय संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच 4 सामन्यांत 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. या सामन्यात पराभव झाल्यास टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास इथेच संपेल.
फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवणे मोठे आव्हान
ऑस्ट्रेलियन संघाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांना पराभूत करणे भारतासाठी सोपे असणार नाही. चालू विश्वचषकात कांगारू संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 9 विकेट्सनी, तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा 98 धावांनी आणि चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा 113 धावांच्या प्रचंड फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाला रोखणे हे भारतीय महिला संघासमोर मोठे आव्हान असेल.
भारताने जिंकली नाणेफेक; प्लेइंग-11 मध्ये बदल
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग-11 मध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, नंदिनी शर्माच्या जागी क्रांती गौडचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता या करो या मरोच्या लढतीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.