‘मी माझ्याच नातवाला का संपवू? मला प्रकरणात गोवलंय, मी तर…’; बंडू आंदेकरचा कोर्टात युक्तीवाद,
पुणे : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला १९ वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या करण्यात आली, या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. या सहाही आरोपींना काल (मंगळवारी) कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर बंडू आंदेकरच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत हा गुन्हा झाला तेव्हा तो इथे नव्हता असा युक्तीवाद देखील केला. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बंडू आंदेकरने कोर्टामध्ये केला. बंडू आंदेकरच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. त्याचबरोबर इतर माहिती, तपास करायचा असल्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली, अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सहाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाने आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बंडू आंदेकर कोर्टात काय म्हणाला?
बंडू आंदेकरने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे. आम्ही केरळला होतो. आमची पोलिसांच्या विरोधात काही तक्रार नाही. पण आम्हाला अडकवलं गेलं आहे”, असं बंडू आंदेकरने कोर्टात सांगितलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
“आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहोत. जी FIR झाली ती चुकीची आहे. कल्याणी माझी मुलगी आहे, जिने याबाबतची फिर्याद दिली. जो मयत झाला तो नातू आहे. आमची नावे का आली? गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्यादी आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणीने देखील कट रचला होता. तिच्या घरचे अटक झाले आहेत, अशी बंडू आंदेकरची बाजू वकिलांनी
हे कोर्टात पुढे ठेवले गेले.
“मी माझ्या नातवाचा खून का करू? मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर प्रतिस्पर्धीला मारेन. वनराचे खूप फॉलोअर्स आहेत. तो लोकप्रिय होता. त्यापैकी कुणी मारलं असेल. त्याचे खूप फॅन आहेत”, असा युक्तीवाद बंडू आंदेकरने केला आहे.
“मी फिर्यादीच्या पतीचे, साऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतले आहे म्हणून माझं नाव यात गोवलं गेलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हेच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे”, असंही बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं आहे.
“दत्ता काळे याने माझ नाव घेतलं नाही. आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं. आमच्याकडून काय रिकव्हर करायचं आहे? आम्ही राज्यात नव्हतो. आम्ही केरळमध्ये होतो. आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही. पिस्तूल माझ्याकडून कशी जप्त करायची आहे?”, असा सवाल बंडू आंदेकरने केली. तसेच “वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर अटक केली आहे, लेडीज ऑफिसर नव्हते तरीही अटक केली आहे”, अशी तक्रारदेखील आरोपींच्या वकिलांनी यावेळी कोर्टात केली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती?
आयुष कोमकर हत्या प्रकरणात एकूण १३ जणांनी कट रचला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. पिस्तूल आम्हाला जप्त करायचं आहे, पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहे, त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे त्यांना शोधायचं आहे याबाबत सखोल तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी केली होती, यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. आंदेकर टोळीने हा खून केला आहे. आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यांची ओळख परेड घ्यायची आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका एका आरोपीवर ३-३ किंवा २-२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध आहे कट रचत खून केला असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.