बंगालमध्ये 4 हजार ईव्हीएम जाळले
सरकारी इमारतीला भीषण आग; मोठ्या घातपाताचा संशय
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 4,000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) जळून खाक झाली आहेत. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. राज्य सरकारमधील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे मंत्री कौशिक चौधरी यांनी ही माहिती दिली. या घटनेप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घातपाताचा संशयही व्यक्त केला जात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण कोलकात्यातील अलीपूर परिसरातील नऊ मजली सरकारी इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली होती. या इमारतीत दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषद कार्यालयासह विविध सरकारी विभागांची कार्यालये होती. इमारतीला लागलेल्या आगीत सुमारे 4,000 ईव्हीएम बेचिराख झाली आहेत. राज्यात यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान 10 मतदारसंघांमध्ये या ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. ही सामान्य आग वाटत नाही. यात कुठे तोडफोड किंवा घातपात झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे. तसेच आग नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत नेमकी कशी पोहोचली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या माहितीनुसार, आग सर्वप्रथम इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर दिसून आली होती. मात्र त्यानंतर आग चौथा, पाचवा आणि सहावा मजला तुलनेने कमी प्रभावित करून थेट सातव्या आणि आठव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली. हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आग चौथा, पाचवा आणि सहावा मजला मोठ्या प्रमाणावर प्रभावित न करता सातव्या आणि आठव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. सखोल तपासासाठी आम्ही फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, असे चौधरी यांनी सांगितले.
Comments are closed.