वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी (Abu azami) आज तुळजापू, सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आषाढीच्या वारीसंदर्भाने केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होताना पाहायला मिळत आहे. आषाढीच्या वारीचे उदाहरण देत त्यांनी नमाज पाठणासाठी रस्त्यावर येत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या भावनांची भूमिका मांडली. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम (मुस्लिम) व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळं रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही, असे आझमी यांनी म्हटले. दरम्यान, सध्या पुणे जिल्ह्यात तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखींची उत्साहात पायी वारी (Pandharichi wari) सुरू आहे. त्यामुळे, आता आझमींच्या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन, आता नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केलीय. आमदार अबू आजमी यांच्या वारी संदर्भातील वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी निषेध केलाय. ऐन वारीच्या वेळेवर अबू आझमी यांचं आलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. अबू आझमी यांना वारकरी संप्रदायाबद्दलचं ज्ञान नसल्याने त्यांनी आधी वारकरी संप्रदायाबद्दल अभ्यास करावा, असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. तर, एकनाथ खडसेंनी देखील जहाल प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलो होतो. येत असताना मुक्ताईंच्या पालखीचे दर्शन घेतले. याचवेळी आमचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांची देखील भेट घेतली, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आजच पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतल्याची माहिती दिली. तसेच, अबू आझमी जे भाष्य करतात ते वादग्रस्त असतं, ते अतिरेक्यांप्रमाणे आणि धर्माशी जोडलेले वक्तव्य करतात, असे एकनाथ खडसेंनी म्हटले. नमाज पठणाला कोणीही विरोध केला नाही, आणि पांडुरंगाच्या वारीला देखील केला नाही. या देशात आणि राज्यात दोन्ही समाज एकत्र नांदत असताना राजकारण्यांच्या सोयीसाठी काही लोक वेगवेगळे वक्तव्य करत आहेत, असे अबू आझमींच्या वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंनी म्हटले.
काय म्हणाले होते अबू आझमी
कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने आजपर्यंत रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
हेही वाचा
शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडला होता; मंत्री गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा
आणखी वाचा
Comments are closed.