तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उद्धव विचार) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेसह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भाने या बैठकीत चर्चा झाली. जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील (Voter list) घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका (Election) न घेण्यावर विरोधक ठाम असल्याचं आजच्या बैठकीत पाहायला मिळालं. तसेच, बैठकीनंतर अनिल परब, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, नितीन सरदेसाई, प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे,काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष मिळून बोगस मतदार याद्या सकट घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीला विरोध करणार आहेत. राज्य निवडणूक आयोग जरी आपला कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर करत असेल, तरी जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत विरोधक निवडणुकांना विरोध करत राहतील अशी भूमिका आजच्या बैठकीतून घेण्यात आली आहे.

तोपर्यंत निवडणुका नाहीच- विरोधक

जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत. मोर्चाच्या दिवशी पुढील भूमिका सर्व महत्त्वाचे पक्षाचे नेते मांडणार आहेत. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत विविध पर्यायांवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे व इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मोर्चाबाबत अनिल परब यांनी दिली माहिती

आम्ही 1 तारखेला सत्याचा मोर्चा काढत आहोत. सत्य लोकांना कळावं आणि असत्य लोकांना कळावं यासाठी मोर्चा काढत आहोत. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरूवात होईल, मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका गेटपर्यंत हा मोर्चा जाईल, अशी माहिती शिवसेना नेते तथा आमदार अनिल परब यांनी दिली. मतचोरी बाबत आंदोलन पार पडल्यानंतर आम्ही पुढील दिशा जाहीर करणार आहोत. मोर्चाला ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु, आजची पत्रकार परिषद फक्त नियोजन आढावा सांगणारी होती. शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. आम्ही ज्या मागण्या आयोगाकडे केल्या होत्या, त्याबाबत आम्ही मोर्चामध्ये बोलणार आहोत, असेही परब यांनी सांगितले.

सातत्याने असत्याची कास धरणाऱ्यांना सत्याची आठवण व्हायला लागली आहे. नौटंकी राजकारण होताना दिसत आहे. विरोधकांकडून भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फॅशन स्ट्रीटला जिथे फेरीवाले बसतात तिथून मोर्चाला सुरुवात आहे, हे राजकीय फेरीवाले आहेत, इथे बस तिथे बस असं सुरु आहे, असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या मोर्चावर जोरदार टीका केलीय. सत्तेसाठी व्याकूळ झालेला मोर्चा आहे. महादेव जानकर काय म्हणाले, सत्तापालट झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशात, सत्तेसाठीची तळमळ मळमळ दिसायला लागली आहे. सगळे चोर एकत्र आले आहेत, मतांची चोरी कशापद्धचीने केली हे देखील आम्ही सांगू. यांनी निवडणुका लढवून कशा चोऱ्या केल्या, याचे उत्तर देणार आहोत, असेही दरेकर यांनी म्हटलं.

हेही वाचा

धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली

आणखी वाचा

Comments are closed.