कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विषारी अथवा रासायनिक पदार्थामुळे मृत्यू झाल्याच्या शक्यतेची डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेच हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत आहे. चौघांची स्थिती ही अन्नातून होणाऱ्या विधबाधेपेक्षा खूपच खराब होती, असं डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
चौघांच्या मृत्यूच गूढ अधिकच वाढलं- (Watermelon Death Case Mumbai)
अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीने आणि एवढी गंभीर स्वरूपात प्रकृती खालावत नसल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केलंय. त्यामुळे कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं. सुरुवातीला कुटुंबीयांना उलट्या सुरू झाल्या त्यानंतर त्यांची न्यूरोलॉजिकल स्थिती खालावत गेली आणि त्याची शुद्ध हरपली. आणि काही तासातच चौघांचा मृत्यू ओढवला. पोलीस न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन केले जप्त- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.