संजय राऊतांची ‘ऑपरेशन तुडवा’ची धमकी, बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा, गृह विभागाचा तातडीचा आदेश

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या 6 खासदारांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यानंतर या सर्व बंडखोर खासदारांना तातडीने Y+ (Y Plus Security) दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

याबाबत महाराष्ट्र सरकारच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त (Commissioner of Intelligence) शिरीष जैन यांनी 17 जून रोजी एक अधिकृत वायरलेस मेसेज (पत्र) जारी केला आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Shivsena Rebel MPs Y Plus Security : ‘या’ 6 बंडखोर खासदारांना मिळाली सुरक्षा

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गृह विभागाने सर्व पोलीस आयुक्तांना आणि अधीक्षकांना तात्काळ सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

1. संजय देशमुख (खासदार, यवतमाळ)
2. संजय जाधव (खासदार, परभणी)
3. संजय दिना पाटील (खासदार, ईशान्य मुंबई)
4. नागेश पाटील आष्टीकर (खासदार, हिंगोली)
5. ओमराजे निंबाळकर (खासदार, धाराशिव)
6. भाऊसाहेब वाघचौरे (खासदार, शिर्डी)

ऑपरेशन टायगरवर संजय राऊत : 'आता आम्ही ऑपरेशन तुडवा सुरू करणार आहोत'

बंडखोर खासदारांना सुरक्षा देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आणि त्यांच्या बंडखोरीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “तुम्ही आमच्या जिवावर, आमच्या पक्षावर आणि चिन्हावर निवडून आले आहात. जर तुमच्यात हिंमत असेल तर तात्काळ राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा.”

आम्ही आता गद्दारांविरोधात ऑपरेशन तुडवा (Operation Tudva) सुरू करत आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. यंदा शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच वर्षी या गद्दारांनी हे कृत्य केले आहे. तुम्ही तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज घेऊन येतो. जर या खासदारांमध्ये काही क्षमताच नाही, तर मग सरकारने त्यांना तातडीने वाय प्लस सुरक्षा का दिली? असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

राज्यात सुरू असलेल्या या राजकीय संघर्षामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील वाद आता थेट रस्त्यावरील लढाईवर येऊन पोहोचल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.