मला नेतृत्त्वाची हाव नाही, पण ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही! – उद्धव ठाकरे
देशात हिंदुत्त्वाचा आवाज बुलंद करणाऱ्या आणि महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे तेज फुलवणाऱ्या शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात दणक्यात पार पडला. सहा खासदारांनी व्हीप नाकारून गद्दारी केल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे शिवसैनिकांचे रक्त खवळले आहे, हात सळसळत आहेत. महाराष्ट्राच्या मनामनात संताप खदखदत आहे. पक्षाचे नाव, चिन्ह चोरल्यानंतरही वारंवार पक्ष फोडण्याचा, खासदार-आमदार पळवण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारी यंत्रणांची दडपशाही, निधीची कमतरता, पक्ष फोडण्यासाठी दाखवली जाणारी प्रलोभनं अशा हरप्रयत्नाने शिवसेनेचे लचके तोडले जात आहेत. यासगळ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांचा आसूड कसा कडाडणार? ते काय आदेश देणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्षं लागलं होतं. भाषणाच्या शेवटाकडे जात असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नेतृत्वाची हाव नसून आता होत असलेले आरोप शिवसैनिकांना मान्य असतील तर आपण पद सोडायला तयार आहोत, अशी भूमिका मांडली. त्यावेळी सभागृहात नाही.. नाही.. नाही… अशा घोषणा झाल्या. पक्षप्रमुखपदावर उद्धव ठाकरेच हवे असे शिवसैनिकांनी सांगितले. यानंतर ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे म्हटले होते तसेच मी म्हणतो की, ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा समारोप केला.
स्वार्थाने बरबटलेल्या राजकीयक्षेत्रातील काळ्याकुट्ट अंधारात देखील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ती मशाल घेऊन त्यांनी शिवसैनिकांना पुढल्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे अंगावर वार झेलून देखील शत्रूवर तुटून पडणाऱ्या सेनापती सारखं होतं. त्यांच्या शब्दाशब्दांत तोच त्वेष जाणवला. ‘कशासाठी पक्ष फोडताहेत, कशासाठी ही फोडाफोडी सुरू आहे. त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे. सत्तापिपासू म्हणजे काय वृत्ती असते ते दिसून येत आहे, अशा शब्दांत पक्षफोडणाऱ्यांवर ते अक्षरश: बरसले. ‘आज भाजपकडे संसदेत 2/3 बहुमत नाही पण त्यांच्या खासदारातील 2/3 भाजपबाहेरील उपरे आहेत.’, असं म्हणत त्यांनी दिल्लीश्वरांची पिसं काढली. गद्दारांवर बोलताना,’ ठाकरे कटुंबावर टीका झाली, त्यावेळी या गधड्यांपैकी विरोधकांचे वार झेलायला कोण पुढे आले होते?’, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली. त्याच्या या ज्वलंत भाषणावेळी समोर असलेला शिवसैनिकांचा शिवसागर पेटून उठल्या सारखा प्रतिसाद देत होता. ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत पुढील काळातील लढ्यासाठीचा शंखनाद करत होता. ‘गद्दारांना सोडणार नाही’, ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आज शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन आहे. आणि ६०वा वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो. नेहमी प्रमाणे मी भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर आहातच पण मला दिलेल्या हिऱ्याहीपेक्षा मौल्यवान, जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आणि ही देणगी वडिलोपार्जित आहे. त्यामुळे कोणीही माइका लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल. पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटं पेटलेला आहे. आणि त्या कांबळेला कसा तुडवला… पुढचं तुम्हाला माहिती आहे. अनेकजण मला सांगाताहेत की उद्धवजी तुम्ही आदेश द्या, म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले.
विशेषतः चार खासदारांचा सत्कार तर केलाच. त्यांच्यासोबत आपले हक्काचे २० आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत. आणि या चॅनेलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेबप्रेमी हा कार्यक्रम बघताहेत, तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार मी पूर्ण करू शकत नाही. कारण संकटामागून संकटं आली, येतील पुढेही येतील. पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी अहं सुद्धा करणार नाही. ही ६० वर्षे ही काही साधी नव्हती. या ६० वर्षांमध्ये ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, तुरुंगवास भोगले, रक्ताचं पाणी केलं. त्यातले काहीजण आपल्यात आहेत, काहीजण आपल्यात नाहीत, त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी ती त्यावेळेला होती मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलवडे किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे-जे काही त्यावेळेला कष्ट घेतले ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसताहेत. संकटं अनेक आली. हे काही संकट नाहीच. ज्या वेळेपासून आपण यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागतो तिकडे आपण फसलो. शिवसेनाप्रमुखांनी तेव्हाचे जे गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता, आपली सत्ता होती आपलं सरकार होतं आणि एक घटना अशी घडली होती की, जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते. शिवसेनाप्रमुखांना भेटायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. इंद्रजीत गुप्ता यांनी सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, “तुम्ही काय कराल? माझं सरकार बरखास्त कराल ना? एक लक्षात घ्या आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे.” ही ६० वर्षे त्याच्यात आणीबाणी आली. आणीबाणीचा काळ आणखी भयानक होता. तेव्हा या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या आहेत. त्यावेळेला रजनी पटेल आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता आणि त्याने शिवसेनाप्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार, अरे ३० वर्षे भाजपसोबत राहून भाजपात विलीन नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेनाप्रमुखांनी उत्तर दिलं होतं. सही करणार नाही, फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग ज्या क्षणी तू मला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी प्रेतयात्रा निघालेली असेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत देत आपण इथेपर्यंत आलेलो आहोत. कारणं काहीही सांगताहेत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंधे सेनेत विलीन होईल. एक भाजपवाला सांगत होता की उद्धवजी आमच्यावर काय दिवस आलेत. आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली. पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत आहेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल जा मिंधेची दाढी खाजवा, म्हटलं कळलं एवढं पुरेसं आहे. आम्हाला खाजवावी लागते दाढी, ही अशी वेळ आली? आहे कुठे तो भाजप? आज भाजपकडे संसदेत दोन तृतियांश बहुमत अजिबात नाही. पण जेवढे भाजपचे खासदार आहेत त्याच्यात दोन तृतियांश सगळे बाहेरचे आहेत. अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची का पळवताहेत? तुमच्या वांझोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, तुमच्यामध्ये विचारांचं वांझोटेपण आहे. आमची कशाला पोरं पळवताहेत? किती पळवाल पळवून पळवून. तुमची पोरं पळवणारी टोळी आणि आमची काय पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मी कोणाला भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आलास? प्रत्येक लोकसभेच्या वेळेला किमान १० ते ६ सभा मी घेतल्या होत्या. तेव्हा हे निवडून आलेत. पण मी जर का गर्वाने म्हटलं की, मी तुला निवडून आणलं, मी तुला तिकीट दिलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत. कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. याचं भान मला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.
शहरांमध्ये झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. शहारांमध्ये वडापाव माहिती आहे, पण वटसावित्रीचा वड गेला. त्याच्या भोवती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो त्याच्या पारंब्या मोठ्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो. त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला तुझ्या मागच्या खोडाला केला हे लक्षात ठेवा. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती हे शिंतोडे उडवताहेत मला कळत नाही, ही कुठली अवलाद? ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला त्या रक्तामध्ये ही भेसळ कुठून आली ही कोणाची अवलाद आहे? मला आठवतंय शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या क्षणाचे साक्षीदार मी चंदू मामा असे दोन-तीनजण राहिलो असो. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्या समोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकली याची मला कल्पना नव्हती. पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सविस्तर वृत्त लवकरच….
Comments are closed.