संघ कार्यक्रमानंतर ‘राज’कीय टीका; विश्वास नांगरे पाटलांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले, मी..

नागपूर : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या भाषणानंतर सोशल मीडियातून त्यांना लक्ष्य करण्यात आलं. नुकतेच विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून आजच त्यांनी नागपूरचा (Nagpur) पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच, संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन होत असलेल्या राजकीय टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, असेही नांगरे पाटील (Vishwas nangare) यांनी म्हटले.

मी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कार्यभार स्वीकारला आहे. ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपिटलमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवला आहे, ते पाहता ही मोठी जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग करणे, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य राहील. आमच्या खांद्यावर “IPS” लिहिलेले आहे, त्यातील “S” हे सर्विस म्हणजेच लोकांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे फक्त गुन्हेगार हेच पोलिसांना घाबरले पाहिजे, सर्वसामान्य हे पोलिसांना घाबरता कामा नये, असे नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.

संघाच्या कार्यक्रमातील सहभाग आणि झालेल्या वादावरही विश्वास नांगरे पाटील यांनी भूमिका मांडली. मला सगळ्यांचा प्रचंड आदर आहे, मी पोलिस सेवेचा अधिकारी असून माझी पूर्ण कटिबद्धता संविधानाशी आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपुरात दीक्षाभूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहेत, विविध संघटन, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वभाविक आहे, असे नांगरे पाटील यांनी म्हटले.

ज्या बद्दल आक्षेप घेतले जात आहेत, ते 19 एप्रिलचे कार्यक्रम आहे. त्यासाठी सानपाडा येथील कार्यकर्ते निमंत्रण घेऊन आले होते. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक होते. GST संदर्भात मार्गदर्शन तिथे झाले, आध्यात्मिक मार्गदर्शन ही त्याठिकाणी काही तज्ञांनी केले. मी गेली 30 वर्ष पोलीस सेवेत आहे. मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेही गेलो होतो, असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो, त्याच मालिकेत मी याही कार्यक्रमात गेलो. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनाही बोलून दाखविली अमली पदार्थांच्या तरुणाईला होणाऱ्या हानीबद्दल देखील बोललो. त्याशिवाय पोलिस दलातील संधी बद्दल बोललो, त्यामुळे त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, असेही नांगरे पाटील यांनी म्हटले. ते क्रार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे आणि rss ला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल होते. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले असे वाटत नाही, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

तर राजीनामा द्या, राज ठाकरेंचा सल्ला

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, अशा शब्दात राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. “तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा थेट आणि जाहीर सल्ला देखील राज ठाकरेंनी दिला होता.

हेही वाचा

मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

Comments are closed.