बदलापूरचे नारायणा स्कुल विनापरवाना, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्ष,मुख्याध्यापकावर गुन्हा
ठाणे : यंदाच्या वर्षासाठी शाळांचे (School) शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थीही शालेय कामात, अभ्यासात मग्न झाले आहेत. मात्र, पुन्हा एकदा बदलापुरातील शाळा केंद्रस्थानी आली असून शिक्षण विभागाने चक्क शाळेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापकावरही गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर (Badlapur) येथील नारायणा इंग्लिश मीडियम स्कुलविरोधात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. आवश्यक शासकीय मान्यता नसतानाही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होऊनही शाळा अजूनही सुरूच असल्याचा प्रकार समोर आलाय.
शाळा प्रशासनाविरुद्ध सातत्याने विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी येत असतात. नुकतेच आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शाळांकडून दुय्यम वागणूक दिल्याची पालकाची ओरड होती. तसेच, काही शाळांकडून पाठ्यपुस्तकांसाठी पैशांचीही मागणी केल्याचे पालकांचे म्हणणे होते. मात्र, आता चक्क शिक्षण विभागालाही शाळा प्रशासन जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. बदलापूरच्या शिरगाव येथील नारायणा शाळेविरोधात अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षण विभागाने या शाळेला अनधिकृत घोषित करून बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षी प्रवेश न घेण्याचेही बजावले होते. विशेष म्हणजे, शाळेबाहेर फलक लावून विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचं आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आलं होतं. मात्र, तरीही शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी शाळा सुरू केल्याने शाळेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, प्रतिदिन 10 हजार रुपये दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पोतेकर यांनी दिली. अनधिकृत शाळेला टाळे ठोकण्याचा अधिकार शिक्षण विभागाला नाही. त्यामुळे, ही दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शाळेवर ठोस कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सध्या या शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग सुरू असून 538 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शाळा प्रशासन नेमकं काय भूमिका घेतंय याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
शाळा प्रशासन गप्प
दरम्यान, याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता, शाळा प्रशासनाने मीडियाशी बोलण्यासही नकार दिला. त्यामुळे, शाळा अध्यक्ष आणि प्रशासनला नेमका कशाची मुजोरी आहे, ते मुग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
हेही वाचा
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.