वैभव सूर्यवंशीच्या वादळी फॉर्ममुळे वाढली संजूची डोकेदुखी! पुनरागमनावरून रंगली नवी चर्चा

झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने धमाकेदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या. या प्रभावी कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात माजी अष्टपैलूने वैभवच्या या लक्षवेधी कामगिरीमुळे संजू सॅमसनसह कोणालाही भारताच्या टी20 संघात आपले स्थान पुन्हा मिळवणे कठीण होऊ शकते.

15 वर्षीय वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तो 19 चेंडूंत 50 धावा करत बाद झाला. त्यानंतरच्या सामन्यात त्याने 9 चेंडूंत 20 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर त्याने कहर फलंदाजी केली. उत्तम शॉट्स खेळत खेळपट्टीवर टिकून त्याने त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

वैभवने तिसऱ्या सामन्यात 49 चेंडूंत 81 धावा केल्या. यामुळे तो वयाच्या 15 व्या वर्षी पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय ध्ये दोन अर्धशतके झळकावणारा एकमेव खेळाडू ठरला.

वैभवची ही कामगिरी पाहता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले की, “हा मुलगा ज्याची जागा घेईल, त्याला तो पुन्हा परत येऊ देणार नाही… वैभव सूर्यवंशी किती खास आहे!!”

पठाणच्या विधानामुळे संजू सॅमसन भारताच्या टी 20 योजनांमध्ये कायम आहे की वैभव त्याच्या पुढे गेला आहे? या चर्चेला वाचा फुटली आहे.

संजू आयर्लंड दौऱ्यातील टी 20 सामन्यांमध्ये भारताचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर म्हणून खेळला, मात्र त्याला धावा करण्यात अपयश आले आणि वैभवला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली. त्यामध्ये वैभवही अपयशी ठरला आणि पाचव्या टी20 सामन्यासाठी संजू संघात परतला, मात्र संघाला व्हाईटवॉश टाळता आला नाही.

भारताचे पुढील टी20 सामने आणि निवडीसाठी लढाई
संजूला झिम्बाब्वे दौऱ्यातील टी20 मालिकेतून वगळले, तर वैभवने मिळालेल्या संधीचे सोने करत प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे भारताच्या पुढील टी20 मालिकेसाठी दोघांमधील कोणाला जागा मिळणार, हा विषय अधिक चर्चेचा राहिला.

भारताची पुढील टी20 मालिका आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. यासाठी भारताचा संघ निवडला गेला असून, वैभव आणि संजू दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. तेव्हा सलामीला कोण येणार, हे कळेलच.

त्याचबरोबर अभिषेक शर्माचाही फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. तो सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने मागील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 2, 8, 1, 3, 16 आणि 10 अशा खेळी केल्या आहे. त्यामुळेही आगामी सामन्यांसाठी भारताच्या सलामीच्या जोडीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.