मुंबई-गोवा महामार्गावर पालकमंत्रिपदाच्या बॅनरची क्वॉलिटी A1, तर रस्ते स्पेस टेक्नोलॉजीने बनवले! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

पालकमंत्री झाले म्हणून याच पुलावर चांगले बॅनर लागलेत. बॅनरची क्लालिटी ए 1 आहे आणि रस्त्यावरची क्वॉलिटी स्पेस टेक्नोलॉजी आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच जनतेकडून टोलचे हजारो कोटी रूपये ओरबाडायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची…आणि कोकणवासीयांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावायचा, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली. माणगावमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, स्पेस टेक्नोलॉजीने हा पूल आता बांधलेला आहे. काही दिवसांपूर्वीच या पूलचे उद्घाटन झाले होते. स्थानिकांनी याबाब तक्रार केली तेव्हा प्रशासनाने याची चौकशी केली. त्यानंतर हा पुल पुन्हा बंद झालेला आहे. हा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असून नॅशनल हायवे ऑथोरिटीकडे या पुलाची जबाबदारी आहे. या मार्गावर काही ठिकाणी खड्डे आहेत. पाणी इतकं साचलंय की त्यात मासेही आहेत. आठ दिवसांपूर्वीच या पुलाचे उद्घाटन झाले होते. ही अवस्था आहे मुंबई-गोवा महामार्गाची. गेली 10 वर्षे प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी आम्ही ऐकतोय की, हा महामार्ग पूर्ण होणार. काही ठराविक मंत्री येतात आणि पाहणी करतात, त्यानंतर प्रशासन येतं आणि डागडुजी करून जातात त्यानंतरही हा मार्ग असाच राहतो. या पुलाच्या खालचा रस्ता पाहिला तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. पालकमंत्री झाले म्हणून याच पुलावर चांगले बॅनर लागलेत. बॅनरची क्लालिटी ए 1 आहे. रस्त्यावरची क्वालिटी स्पेस टेक्नोलॉजी आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

या मार्गाची पाहणी केल्यानंतर एक्सवर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केली. त्यात आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सातत्याने रस्त्यांची दुरवस्था, आवश्यक सोयी सुविधांचा अभाव यामुळे नाशिक पुणे औद्योगिक पट्ट्यातून बाहेर पडणारे उद्योग याविषयी बोलत आहे. ह्या ठिकाणच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, उद्योजक त्रस्त असल्याचे जाणवले. ह्याच पार्श्वभूमीवर आज कोकण दौऱ्यावर आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती ‘जैसे थे’च आहे. उलट अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथे रस्त्याची दुरवस्था आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली. डोलवी येथील रस्त्याची, अंडरपासची पाहणी केली. एखादा पाण्याचा मोठा डोह, असल्यासारखा हा अंडरपास भासत होता. ह्या पाण्यात मासे दिसत होते. येथे तुंबलेल्या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना रोज मार्ग काढावा लागत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वारसगाव येथे रस्त्याची पाहणी केली. आमचा दौरा जाहीर होताच, इथेही खडी टाकून खड्डे बुजवण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आला. ही ‘सक्रियता’ प्रशासन आधीच का दाखवत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपास रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावर चिखल, महाकाय डबकी… जनतेकडून टोलचे हजारो कोटी रुपये ओरबाडायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची…आणि कोकणवासीयांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावायचा असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.