‘ईशान किशनला वाटलं मला चेंडू देऊन चूक केली…’, वैभव सूर्यवंशीचा आपल्या गोलंदाजीवर मोठा दावा

वैभव सूर्यवंशी 2026 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोन संघाचा भाग आहे आणि तो संघाचा उपकर्णधार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात वैभव फलंदाजीत अपयशी ठरला, पण गोलंदाजीत मात्र त्याने संपूर्ण लक्ष वेधून घेतले. संघाचे नेतृत्व ईशान किशन करत आहे. ईशानने सामन्याच्या तिसऱ्या डावा दरम्यान वैभवच्या हातात चेंडू सोपवला. वैभवने सांगितले की, कर्णधार ईशानला वाटत होते की त्याला षटक देऊन त्यांनी चूक केली आहे, पण निकाल मात्र भलताच निघाला.

​वैभवने 3 षटकांच्या स्पेलमध्ये 2 बळी मिळवले आणि या दरम्यान त्याने फक्त 11 धावा दिल्या. सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हीडिओ शेअर केला, ज्यामध्ये वैभवने आपल्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले.

​व्हीडिओमध्ये वैभव म्हणाला, “तुम्ही कोणत्याही फलंदाजाला विचारले, तर त्याला गोलंदाजी करायला नक्कीच आवडते. एक फलंदाज नेहमीच गोलंदाजीचा आनंद घेतो आणि एक गोलंदाजसुद्धा अशाच प्रकारे फलंदाजी पसंत करतो. प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स पडत नव्हत्या, म्हणून मी 2 किंवा 3 षटके टाकण्यासाठी विचारणा केली. ईशान भाऊला वाटले की ते चूक करत आहेत, पण त्यांना माहीत नाही की मी विकेट घेणारा गोलंदाज आहे.”

​व्हीडिओत आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीबद्दल बोलताना वैभव म्हणाला, “माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, मी 5 बळी घेतले तरीही मी फक्त 3 च षटके टाकेन. योजना हीच होती की मी जितकी शक्य तितकी उत्तम गोलंदाजी करेन, एकाच टप्प्यावर गोलंदाजी साधून आपला स्पेल चांगल्या प्रकारे पूर्ण करेन.”

​पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव अवघ्या 08 धावांवर बाद झाला होता. यावर तो म्हणाला, “हे खूप मजेशीर होते कारण फलंदाजी चांगली झाली नव्हती. त्यामुळे चेंडूने योगदान देणे छान वाटले. जेव्हा एखादा फलंदाज विकेट घेतो, तेव्हा त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. हे खरोखरच अप्रतिम होते.”

Comments are closed.