Nirmalya Reuse: बाप्पाच्या निर्माल्याचा असा करा भन्नाट पुनर्वापर
गणपती बाप्पाच्या पूजेनंतर फुलं, हार, पानं आणि दुर्वांचं मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतं. हे निर्माल्य कचऱ्यात टाकण्याऐवजी त्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर केला, तर पर्यावरणाची काळजी घेण्यासोबतच त्यापासून उपयोगी वस्तूही तयार करता येतात. म्हणूनच, जाणून घेऊयात बाप्पाच्या विसर्जनानंतर फुलं आणि हारांचं नेमकं काय करावं.
नैसर्गिक रंग
झेंडू, शेवंती आणि गुलाबासारखी फुलं स्वच्छ करून पूर्णपणे वाळवून घ्या. त्यांची बारीक पावडर करून नैसर्गिक रंग म्हणून वापरता येते. फुलांच्या रंगानुसार वेगवेगळ्या छटा मिळू शकतात. मात्र रंग तयार करताना फुलांवर रासायनिक स्प्रेचा मारा नसल्याची खात्री करा.
सुगंधी पोटपुरी
वाळलेल्या फुलांच्या पाकळ्यांपासून घरासाठी सुंदर सुगंधी पोटपुरी तयार करता येते. त्यात गुलाबाच्या पाकळ्या, वाळलेली फुलं, लवंग, दालचिनी किंवा सुगंधी नैसर्गिक पदार्थ मिसळू शकता. ही पोटपुरी सजावटीसाठीही वापरता येईल.
नैसर्गिक खत
फुलं, पानं आणि दुर्वा यांचं नैसर्गिक खत करता येतं. त्यासाठी निर्माल्यातील प्लास्टिक, धागे, वायर, थर्माकोल आणि कृत्रिम सजावटीचं साहित्य आधी वेगळं करा. सेंद्रिय निर्माल्याचा योग्य पद्धतीने कंपोस्टमध्ये वापर केल्यास ते झाडांसाठी उपयुक्त खत बनू शकते.
निर्माल्य जमा करतानाच ते इतर कचऱ्यापासून वेगळं ठेवणं महत्त्वाचं आहे. बाप्पाच्या उत्सवानंतर निर्माल्याचा योग्य पुनर्वापर करून उत्सवाला पर्यावरणपूरक टच देता येईल.
Comments are closed.