अदृश्य शक्तींकडून कारवाई, खोटं षडयंत्र…; अजितदादांनी वेगळा गट स्थापन का केला?, शशिकांत शिंदें

पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यात दोन मोठे पक्ष फुटले, त्याचबरोबर राजकीय समीकरणं बदलली आणि मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली, त्यानंतर काही महिन्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गणित थोडं वेगळं झालं, राज्याच्या सरकारमध्ये एकत्रित असलेले पक्ष वेगवेगळे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, या दरम्यान पक्ष फुटीने वेगळे झालेले राष्ट्रवादीचे दोन्ही (NCP Merger) पक्ष एकत्रित आले, आणि पुन्हा हे दोन्ही पक्ष एकमेकात विलीन होणार अशा चर्चा सुरू झाल्या. कालांतरांने ही फक्त चर्चा नसून त्यात तथ्य असल्याचं चित्र दिसलं, अजित पवार आणि शरद पवारांच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये विलीणीकरणाबाबत (NCP Merger) चर्चा, बैठका झाल्याचे दावे नेत्यांकडून करण्यात आले, तर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर विलीनीकरण (NCP Merger) आणि एकत्रित येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दादांना श्रध्दाजंली वाहणारा एक लेख लिहला असून त्यात पक्षाची फूट, विलीनीकरण, दादांचे प्रयत्न याबाबत सखोल भाष्य केलं आहे.

NCP Merger:  दादा बाहेर का पडले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, “अदृश्य शक्तींच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे, परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळीत होते, अशी माहिती देखील त्यांनी या लेखातून दिली आहे.

NCP Merger: दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले

12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी चे विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा व अपेक्षा होती त्यासाठी ते आग्रही होते, पण मध्येच काळाने झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे त्यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत राष्ट्रवादीचे विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

NCP Merger: राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनीच 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल–सुनील तटकरे गटाकडून रोहित पवारांना खुले आव्हान देण्यात आले. त्यावर रोहित पवारांनी, “दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगतो आहोत,” असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.