Asian Games: टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवं वेळापत्रक!

जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बाद फेरीतील (नॉकआउट स्टेज) काही सामने आता मूळ नियोजित वेळेपेक्षा 30 मिनिटे लवकर सुरू होतील. सुधारित वेळापत्रकानुसार, दुपारी होणारे पुरुषांचे सामने आधीच्या दुपारी 2 वाजण्याच्या नियोजित वेळेऐवजी दुपारी 1.30 वाजता सुरू होतील. मात्र, महिलांच्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत.

भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. जपानची वेळ भारताच्या वेळेपेक्षा 3 तास ​30 मिनिटे पुढे असल्याने, हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) सकाळी 10 वाजता सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावरही स्थानिक सुरुवातीची वेळ दुपारी 1.30 अशीच नमूद केली आहे. भारतीय पुरुष संघ 28 सप्टेंबर रोजी आपला सामना खेळणार आहे.

दुसरा उपांत्य सामना आणि सुवर्णपदकाचा सामनाही स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, वेळापत्रकातील या बदलाची माहिती अद्याप सर्व संघांना देण्यात आलेली नाही. तसेच, या बदलाबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अधिकाऱ्यांनाही कल्पना नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, सकाळच्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. हे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील, जी वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे 5.30 वाजताची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये लवकर अंधार पडत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. क्रिकेटचे सामने कोरोगी ॲथलेटिक पार्क येथे खेळवले जाणार आहेत. या मैदानावर फ्लडलाइट्सची (कृत्रिम प्रकाश व्यवस्था) सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, मैदानावर पुरेसा प्रकाश नसल्याची समस्या एक मोठा अडथळा ठरली आहे.

Comments are closed.