पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा
बीड : जिल्ह्यातील परळी येथे एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या किंवा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, बीड पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं तपास करत अवघ्या 48 तासांच्या आत या भीषण खुनाचा उलगडा केला आहे. केवळ पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कट रचून खून करणाऱ्या दोन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. अफजलखान ऊर्फ तोहीद पठाण (वय 36) असं खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. तो परळी शहरातील सरदारनगर भागातील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचेच जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना ताब्यात घेतले असून, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अफझलखान याने आपल्या कुटुंबाला मी मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, दोन दिवसांनंतर अचानक परळीतील लेंडेवाडी शिवारात असलेल्या रेल्वे रुळाच्या पटरीवर अफझलचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Beed Police Investigation : सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाने तपास
सुरुवातीला घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असावा असंच चित्र दिसत होतं. परंतु, परळी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने गुप्त माहिती मिळवून तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे अफझलचे जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला या दोन्ही आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केलं असता, पोलिसांचा संशय अधिक बळावला. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जेव्हा दोन्ही संशयितांना खाक्या दाखवला, तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
Extortion Money Dispute : दगडाने ठेचून संपवलं
आरोपी ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांचा अफझलसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद सुरू होता. याच पैशांच्या कारणावरून दोघांनी अफझलचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित प्लॅन आखला होता. बाहेरगावी नेण्याच्या बहाण्याने दोघांनी अफझलला गाठलं आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या डोक्यात व अंगावर दगडाने जबर मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला.
हत्या केल्यानंतर हा खून नसून अपघात किंवा आत्महत्या आहे असं भासवण्यासाठी दोघांनी मिळून अफझलचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर आणून फेकला आणि तिथून पळ काढला.
बीड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परळी शहरात मित्रांच्याच विश्वासघाताची मोठी चर्चा सुरू असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.