मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद जास्त, शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले; शिवसेनेची…
शरद पवार वर छगन भुजबळ: राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांकडे (Municipal Election) वळले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे (BMC Election) सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं.
मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचे की नाही, हे बसून ठरवू. मुंबईत आमच्यात सर्वाधिक ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आहे. साधारणतः आगामी तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्यता आहे. मात्र, आम्ही अद्याप एकत्रित लढण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा केलेली नाही. लवकरच आम्ही सर्वजण काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले की, पवार साहेबांचे वक्तव्य म्हणजे उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार याबाबतीत आहे. त्यात शिवसेनेची ताकद आहे, हे खरे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
मी मुंबईला असलो तरी…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कलची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून मनपा अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांना खडेबोल सुनावले होते. यानंतर प्रशासनकडून द्वारका परिसरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली होती. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मी मुंबईला असलो तरी काय काम चालू आहे का, याचा आढावा मी घेत असतो. द्वारका सर्कल परिसरातील गाड्या आता लवकर पास होत आहेत. प्रत्येक रस्त्यावरून मोठ्या आणि छोट्या गाड्या किती पास होतात याची माहिती घ्या, अभ्यास करा, असा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
दोन-तीन स्कायवॉक ठेवा, बाकीचे पाडून टाका
फेरीवाले आणि इतर विक्रेत्यांवर मनपा आणि पोलिसांनी कारवाई करावी. दोघांनी मिळून काम केले तर काय होते हे दाखवून दिले पाहिजे. द्वारका सर्कल काढले आहे. सर्कलच्या आधी गाड्या थांबल्या पाहिजेत. नाशिकरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे किंवा इतर काही उपाय केले पाहिजे. व्यवस्थित सिग्नल लावले तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. मोठे पूल बांधले, अंडर पास केले तर कोणी कुठे थुंकते, काहीही करतात, त्यामुळे शहर विद्रुप होते. काही लोक पूल बांधण्याची मागणी करतात, त्यांचा हेतू वेगळा असतो. मुंबईत तेच झाले आहे. मुंबईमध्ये स्कायवॉक केले, दोन-तीन चांगले आहेत. मात्र इतर ठिकाणी काहीही चालते. मी मंत्रीमंडळ बैठकीत बोललो आहे की, दोन-तीन स्कायवॉक ठेवा. बाकीचे पाडून टाका, अशी मागणी मी केली होती, असे त्यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.