…तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; फडणवीसांनी सभागृहात सगळं सांगितलं
मुंबई : राज्य सरकारच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी 15 विभाग दिले होते. मात्र, त्यातील अनेक विषय चर्चेत आलेच नाहीत, दुसऱ्याच विषयावर बोलले, त्यांचा तो अधिकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. तसेच, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिलं नाही. मात्र, त्यांनी देवाचं अस्तित्वही नाकारलं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरीला कुठंलही स्थान नसल्याचे म्हटले. तसेच, खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.
भोंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केलं आहे, तसेच याप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी. या प्रकरणाने आपण कुठे जातो याचा विचार करण्याची गरज आली आहे. आपण सर्वजण श्रद्धा मानणारे आहोत मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. अंधश्रद्धा पाळली की कसा विवेक हरवतो हे उदाहरण आहे. सर्वच संतानी देवाचं अस्तित्व स्वीकारलं आहे, नाकारलं नाही मात्र त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात बोलताना म्हटले. संताची शिकवण आपल्याला महत्वाची आहे, आपला महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे मात्र भोंदूगिरीली स्थान नाही मिळालं पाहिजे. जादुटोणा संदर्भात नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आपण केली आहे, जादुटोणा करुन समस्या संपल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार म्हणून त्यालाच नेमला असता, असेही मुख्यमंत्र्यांनी उपरोधात्मकपणे म्हटले.
हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. युद्ध ड्रोनऐवजी लिंबू मिरचीनं लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवादाला इथं बसून टाचण्यांनी संपवून टाकलं असतं, आणि सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते आणि आपली सीमा अगदी त्या ठिकाणी नीट झाली असती. सगळ्यात महत्त्वाचं आशिषजी, प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या, एका ठिकाणी बसून निवडणुका जिंकता आल्या असत्या, असे म्हणत भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण ज्याला स्पिरिच्युएलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कोणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ती श्रद्धा असू शकत नाही ती अंधश्रद्धा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
60 दिवसांत दोषारोपपत्र दाखल होईल
संबंधित गुन्ह्यात 10 वर्षापेंक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळे 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महिलांच्या संदर्भात गुन्हे आहेत ते 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करत आहेत. वकिलांना दोनपेक्षा जास्त अॅडजोनमेंट मागता येणार नाही, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.