मी मिम पाहिला, ज्यात राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत; फडणवीसांकडून मनसेप्रमुखांची फिरकी

देवेंद्र फडणवीस : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. हे खासदार शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, याचा तुम्हाला अनुभव आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सदृढ आहे. दरम्यान, 2029 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची फिरकी घेतली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

आगामी लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान व्हायची तयारी करत आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाचे सहा खासदार हे थेट भाजपमध्ये (BJP) न जाता शिंदे गटात गेले. या सगळ्यामागे अमित शाह (Amit Shah) यांना पंतप्रधान करण्याच्यादृष्टीने रणनीती आखण्यात आल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल एक मिम पाहिला, त्या मिममध्ये राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत. त्या ठिकाणी लिहलंय की, मला शांतपणे झोप लागते कारण माझ्याकडे खासदारही नाही, आमदारही नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लगावला.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’संदर्भातही भाष्य केले. अमित शाह यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी’ऑपरेशन टायगर’ राबवले होते. त्यानुसार ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टीकर पाटील या सहा खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले होते. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी एका वेगळ्याच पैलूकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची ? भारतात सत्ता कोणाची ? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे

सध्याच्या घडीला भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे. आतून सगळं पेटलेलं आहे. नरेंद्र मोदी असल्यामुळे सध्या सगळं शांत आहे. पण काहीजण बोलत आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये केंद्रात आणि अनेक ठिकाणी गोंधळ होईल. त्यामुळे तयार व्हा, ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.

Comments are closed.