आमचे हात बांधलेले आहेत…; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म
भारत VS इंग्लंड 1ली T20 : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत मौन बाळगले आहे. “काही महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देणे सध्या गरजेचे आहे,” असे सांगत अय्यरने एकप्रकारे सूर्यवंशीला पहिल्या सामन्यात संधी मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड झाल्यापासून त्याच्या पदार्पणाची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, खेळाडूंना संघात सुरक्षित वातावरण देणे महत्त्वाचे असल्याचे अय्यरने स्पष्ट केले.
सलामीची जोडी बदलणे कठीण
सध्या भारतीय संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी सलामीला येत आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान द्यायचे झाल्यास या यशस्वी जोडीला बाजूला करावे लागेल. यावर बोलताना अय्यर म्हणाला, “संघातील सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. फक्त एकच खेळाडू चांगला खेळतोय असे नाही. आम्हाला सर्वांना संधी आणि सुरक्षिततेची भावना द्यावी लागेल, जेणेकरून खेळाडूंचा आत्मविश्वास कायम राहील.”
पदार्पणाचे रहस्य कायम
वैभव सूर्यवंशी उद्या पदार्पण करणार का? या थेट प्रश्नावर उत्तर देणे अय्यरने टाळले. तो म्हणाला, “उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. आम्ही नेमक्या कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार, हे अत्यंत गोपनीय आहे. जर आम्ही रणनीती जाहीर केली, तर विरोधी संघाला त्याचा फायदा होईल. वैभव हा अत्यंत प्रतिभावान आणि तरुण खेळाडू आहे, त्याला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तो नक्कीच चमकदार कामगिरी करेल.”
सोशल मीडिया आणि टीकेवर स्पष्ट मत
सूर्यवंशीला संघात समाविष्ट करण्यासाठी चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरून वाढणाऱ्या दबावाबाबत विचारले असता अय्यर म्हणाला, “मी बातम्या पाहत नाही आणि सोशल मीडियाचा वापरही करत नाही. त्यामुळे बाहेर काय चालले आहे, याची मला कल्पना नाही.”
दरम्यान, आयर्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावर बोलताना कर्णधाराने कबुली दिली की, “तो पराभव लाजिरवाणा नव्हता, पण नक्कीच निराशाजनक होता. आयर्लंडचा संघ इतका चांगला खेळेल याचा आम्ही विचार केला नव्हता. त्यांनी आम्हाला प्रत्येक विभागात मागे टाकले. खेळपट्टीचा अंदाज घेण्यात आणि रणनीती आखण्यात आम्ही कमी पडलो, मात्र या पराभवातून आम्ही खूप काही शिकलो आहोत.”
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.