बुमराहच्या खराब कामगिरीवर पोलार्डचा मोठा खुलासा, “तोही माणूस आहे, थोडा संयम ठेवा!”
मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्डने सध्या खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या जसप्रीत बुमराहला पाठिंबा दिला आहे. बुमराहसारख्या दिग्गज वेगवान गोलंदाजाचाही एखादा दिवस खराब जाऊ शकतो किंवा त्याला एखाद्या हंगामात अपेक्षित कामगिरी करता येत नाही, असे त्याने म्हटले आहे. या भारतीय स्टार वेगवान गोलंदाजाबाबत थोडी सौम्यता बाळगावी, असे आवाहन त्याने केले. बुमराहने नुकतीच आयपीएल इतिहासातील त्याची तिसरी सर्वात महागडी गोलंदाजी केली होती.
बुधवारी सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात, बुमराहने त्याच्या चार षटकांत 54 धावा दिल्या. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आला नाही. हैदराबादने हा सामना सहा विकेट राखून जिंकला. रायन रिकलटनच्या नाबाद 123 धावांच्या खेळीच्या जोरावर, मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावून 243 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, सनरायझर्सने हे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले आणि केवळ 18.4 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या. आयपीएलमधील बुमराहच्या सध्याच्या फॉर्मबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता, पोलार्ड म्हणाला, “जेव्हा एखादा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत नसतो, तेव्हा आम्ही त्यामागील कारण समजून घेण्यासाठी प्रत्येक पैलूची तपासणी करतो आणि जसप्रीत बुमराहच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही.”
त्याने पुढे सांगितले, “बुमराहने गेली अनेक वर्षे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माणूस म्हणून, आपल्याकडून चुका होणे, एखादा दिवस खराब जाणे, एखादा हंगाम खराब जाणे किंवा काही महिने कठीण काळातून जाणे हे स्वाभाविक आहे. मला फक्त असे वाटते की, काही वेळा आपण थोडा वेळ थांबून, त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व महान कामगिरीची आठवण काढली पाहिजे. होय, आम्ही वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करतो आणि हे मान्य आहे की, अलीकडच्या काळात त्याने अपेक्षांनुसार कामगिरी केलेली नाही; तरीही, तो खूप प्रदीर्घ काळापासून मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज राहिला आहे. मला फक्त असे वाटते की, आपण क्रिकेटपटूंना कधीकधी थोडी मोकळीक दिली पाहिजे; दुर्दैवाने आमच्यासाठी, आम्ही सतत लोकांच्या नजरेत असतो, त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही खराब कामगिरी करतो, तेव्हा त्या गोष्टीचे प्रमाणाहून अधिक भांडवल केले जाते.”
बुमराहला थोडी उसंत देणे किंवा त्याला थोडी मोकळीक देणे, हे दीर्घकाळासाठी त्याच्या फायद्याचे ठरू शकते, असेही पोलार्डने सुचवले. एमआय संघाचा दीर्घकाळापासून सदस्य असलेल्या पोलार्डने म्हटले, “मला खात्री आहे की तो यशाची आणखी मोठी शिखरे गाठेल आणि बळी मिळवत दमदार पुनरागमन करेल; आणि पुन्हा एकदा, आपण सर्वजण ‘बुमराह-बुमराह’ असा जयघोष करत असू. केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नव्हे, तर भारतासाठीही.” मुंबई इंडियन्स संघाने अद्याप आपली सर्वोत्तम कामगिरी बजावलेली नाही, हे पोलार्डने मान्य केले. परंतु या हंगामात आपला संघ स्पर्धेबाहेर गेला आहे, हे मात्र त्याने स्वीकारण्यास नकार दिला.
Comments are closed.