आम्हाला फॉरमॅटनुसार खेळ कसा बदलावा हे माहीत..’, मालिकेपूर्वी ईशान किशन आणि तिलक वर्मांचं मोठं विधान

चेन्नईमध्ये होणाऱ्या 5 दिवसांच्या दुलीप ट्रॉफीच्या (Dulip Trophy 2026 Final) अंतिम सामन्यानंतर लगेचच दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणे थोडे कठीण जाईल, असे ईशान किशन (Ishan Kishan and Tilak varma) आणि तिलक वर्मा यांना वाटतं आहे. या बदलांतरानंतरही ते टी-20 क्रिकेटमध्ये स्वतःला जुळवून घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

दुलीप ट्रॉफी 2026 चा अंतिम सामना ईस्ट झोन आणि साउथ झोन (East Zone vs South Zone) यांच्यात खेळवला जाणार असून, ईस्ट झोनचे नेतृत्व ईशान किशन आणि साउथ झोनचे नेतृत्व तिलक वर्मा करताना दिसतील.

ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्याशिवाय ईस्ट झोनचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यालाही या व्यस्त वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे. दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना संपल्यानंतर आणि अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्याच्या यादरम्यान त्यांना फक्त तीन दिवसांचा वेळ मिळेल. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील पहिला टी-20 सामना 13 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. यासाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणाही केली आहे.

चेपॉक येथे दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ईशान किशन म्हणाला की, खेळाडूसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणता फॉरमॅट खेळत आहोत हे समजून घेणे. त्याने मान्य केले की, जेव्हा तुम्ही अचानक कसोटी सामन्यातून टी-20 मध्ये येता, जिथे पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके खेळावे लागतात आणि घरच्या संघात परतल्यावर वेगळी भूमिका बजावावी लागते, तेव्हा ते थोडे अवघड होते. मात्र, एक व्यावसायिक खेळाडू म्हणून परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणे हे त्यांचे काम आहे आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या या व्यस्त वेळापत्रकाची आधीच माहिती असते, तेव्हा कारणे सांगण्याला काहीच स्थान उरत नाही, असे त्याने म्हटले.

किशन पुढे म्हणाला की, कारणे काढण्यापेक्षा खेळाडूंनी पुढे काय होणार आहे यासाठी मानसिक तयारी ठेवणे जास्त फायद्याचे ठरते. दुलीप ट्रॉफीनंतर त्याला टी-20 क्रिकेट खेळावे लागणार असून तिथे त्याची भूमिका पूर्णपणे वेगळी असेल, असे तो म्हणाला.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी मिळणारे दोन दिवसांचे सराव सत्र स्वतःला जुळवून घेण्यासाठी पुरेसे असेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

तसेच, गेल्या चार महिन्यांच्या अनुभवामुळे आपण कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी तयार आहोत, असे तिलक वर्माने म्हटले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रत्येक प्रकारच्या वातावरणात खेळल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाते, असे त्याला वाटते. मात्र, पाच दिवसांचा लांब सामना खेळल्यानंतर लगेचच टी-20 संघात सामील होणे थोडे कठीण नक्कीच जाईल. परंतु, दिल्लीत पोहोचल्यावर दोन दिवसांचा आराम आणि सरावासाठी मिळणारा वेळ यामुळे काम सोपे होईल, असे सांगत तिलक म्हणाला की, सतत सामने खेळण्यासाठी मानसिक स्थिती कशी तयार ठेवावी हे मला माहीत आहे.

Comments are closed.