रोहित शर्मा, युवराज सिंह पडले मागे; ईशान किशनने केला मोठा विक्रम
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी करत भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 44 चेंडूंत 81 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
ईशानने कर्णधार श्रेयस अय्यर (25) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. त्यानंतर, त्याने तिलक वर्मा (60*) सोबत चौथ्या विकेटसाठी 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ 17.5 षटकांत 129 धावांत सर्वबाद झाला. परिणामी, भारताने 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या उत्कृष्ट कामगिरीसाठी ईशान किशनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, 2026 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने हा पुरस्कार जिंकण्याची ही चौथी वेळ आहे.
एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत ईशान किशन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतासाठी 22 टी-20 सामने खेळताना त्याने 2026 मध्ये आतापर्यंत चार वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
या कामगिरीसह त्याने युवराज सिंग, रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांना मागे टाकले आहे. युवराजने 2012 मध्ये 10 सामन्यांत 3 पुरस्कार जिंकले होते. रोहित शर्मा (2018 मध्ये 19 सामने), कुलदीप यादव (2018 मध्ये 9 सामने) आणि अभिषेक शर्मा (2025 मध्ये 21 सामने) यांनी प्रत्येकी 3 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीयांच्या यादीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर आहे. त्याने 2022 मध्ये 31 सामन्यांत हा पुरस्कार सात वेळा पटकावला. त्याच्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो, ज्याने 2016 मध्ये 15 सामन्यांत ही कामगिरी सहा वेळा केली होती.
एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू
सूर्यकुमार यादव – ७ (२०२२)
विराट कोहली – 6 (2016)
सूर्यकुमार यादव – ५ (२०२३)
इशान किशन – ४ (२०२६)
युवराज सिंग – ३ (२०१२)
रोहित शर्मा – ३ (२०१८)
कुलदीप यादव – ३ (२०१८)
विराट कोहली – ३ (२०२२)
अभिषेक शर्मा – ३ (२०२५)
Comments are closed.