जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी दिली शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा  हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा

जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केले. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

2018 मध्ये त्रिपुरात भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या विभागांचे नेतृत्व केले. 2018 ते 2023 या कालावधीत त्रिपुराच्या प्रशासनात जिष्णू देव वर्मा यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी भर दिला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची नोंद घेतली जाते.

हेही वाचा

विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?

आणखी वाचा

Comments are closed.