वैभव सूर्यवंशीबद्दल कपिल देव यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय टी-२० संघात वैभवचा समावेश करण्यात आला असला, तरी त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही; मात्र जगभरातील क्रिकेटप्रेमी त्याच्या पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. विश्वचषक विजेते माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी एका मुलाखतीत त्याच्याबाबत वक्तव्य केलं आहे.

कपिल देव यांनी आहे की, टी-२० क्रिकेटमध्ये वैभवची तुलना विराट आणि सचिन यांच्याशी केली जाऊ शकते; तरीही, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्या अफाट प्रतिभेचं कौतुक केलं. मात्र, त्याच्याबाबत सध्या होत असलेल्या अतिप्रशंसेपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

“मी त्याला फारसा खेळताना पाहिलेलं नाही. तो नक्कीच मोठा प्रतिभावान खेळाडू आहे. पण सध्या आपण त्याच्याबद्दल आपण खूप मोठं मोठं बोलतोय, खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त करत आहोत. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. त्याच्यावर इतका दबाव टाकू नका. तो अजून खूप लहान आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याइतकं त्याचं वयही झालेलं नाही,” असं कपिल देव यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “प्रतिभेच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या तोडीचा वाटतो. त्याच्यात तितकी क्षमता दिसते. मात्र, सध्या त्याची प्रतिभा केवळ टी-२० क्रिकेटमध्ये दिसली आहे. इतर क्रिकेट फॉरमॅटमध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल.”

वैभवच्या टी-२०मधील कामगिरीचं कौतुक करताना कपिल देव म्हणाले, “टी-२० क्रिकेटमध्ये तो विलक्षण आहे. एवढ्या कमी वयात अशी छाप पाडणारे खेळाडू एक टक्काही सापडणार नाहीत. सचिनबद्दलही आपण अशीच चर्चा केली होती. तोही खूप लहान होता. त्यावेळी आम्हालाही वाटत होतं की आपण त्याला खूप लवकर संधी देतोय का? पण इतिहास सांगतो की कधी कधी उशीर होण्याचीच भीती जास्त असते. जर एखादा खेळाडू तयार असेल, तर त्याचं वय पाहू नका, त्याची गुणवत्ता पाहा.”

Comments are closed.