गावदेवी मार्केटच्या राखेमधून ‘नवे सुरक्षित, सुटसुटीत आणि सेंट्रल एअर कंडिशन्ड’ मार्केट उभारा; केदार दिघेंचे ठाणे पालिकेला थेट आव्हान
ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक गावदेवी मार्केटमध्ये लागलेली भीषण आग अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. कर्तव्य बजावताना दोन जवानांना वीरमरण आले. या आगीत 150 पेक्षा जास्त स्थानिक व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. फायर ऑडिटचा अभाव, अपुरी अग्निशामक यंत्रणा, अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे ही दुर्घटना घडली. आता ठाणे महानगरपालिका (TMC) प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता, या दुर्घटनेतून धडा घेऊन गावदेवी मार्केटचा संपूर्ण चेहरामोहरा बदलावा. गावदेवी मार्केटच्या राखेमधून नवे सुरक्षित, सुटसुटीत आणि सेंट्रल एअर कंडिशन्ड मार्केट उभारा असे आव्हान केदार दिघे यांनी ठाणे पालिकेला केले आहे.
संपूर्ण मार्केट सेंट्रल एसी आणि सुटसुटीत असावे. कोंदट वातावरण दूर झाल्यास पुन्हा शॉर्ट सर्किट किंवा गॅस सिलिंडरमुळे आग लागण्याचा धोका टळेल. प्रत्येक गाळ्यात स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा, स्मोक डिटेक्टर्स आणि आपत्कालीन निकास असावेत, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही. अनधिकृत अतिक्रमणे हटवून प्रत्येक अधिकृत व्यापाऱ्याला प्रशस्त ओटा आणि हक्काची जागा मिळावी. अरुंद गल्ल्यांमुळे लागणारी आग रोखण्यासाठी अंतर्गत रस्ते मोठे असावेत. अग्निशामक दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा राहील अशा पद्धतीने पार्किंगचे नियोजन करावे, आदि मागण्या केदार दिघे यांनी केल्या आहेत.
केवळ 10 लाखांची जुजबी मदत देऊन पालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. मॉल संस्कृतीच्या काळात आपल्या स्थानिक मराठी आणि छोट्या व्यापाऱ्यांना सुरक्षित व आधुनिक बाजारपेठ देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. प्रशासनाने तात्काळ या प्रस्तावाचा विचार करून नव्या ‘हायटेक व सुरक्षित गावदेवी मार्केट’चा आराखडा जाहीर करावा, अन्यथा ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा केदार दिघे यांनी दिला.
Comments are closed.