पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत काँग्रेस-ठाकरेंचा हातात हात? राज्यसभेवरून वेगळी भूमिका?
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत असून याच अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या सात जागांचीही निवडणूक आहे. त्यातल्या सहा जागा तर महायुती जिंकणार हे निश्चित आहे. पण, मविआच्या वाट्याला जी एक जागा जाऊ शकते, त्या जागेवरुन जोरदार घमासान सुरू झाल्याचं दिसतंय. कधी ठाकरे, कधी काँग्रेस असं दिवसागणिक दावेदार बदलत आहेत. इतके दिवस ठाकरेंच्या शिवसेनेतही एकाच जागेवरुन दोन सूर होते, ते आता बदलताना दिसत आहेत. पवारांच्या खासदारकीवरही मविआत एकमत होताना दिसत नाही. एकूणच काय तर मविआतील घडणाऱ्या सगळ्या घडामोडींमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यसभेच्या एका जागेवरुन मविआत जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि काँग्रेसकडून ‘प्लॅन बी’ची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. राज्यसभेसाठी ठाकरेंची थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शरद पवारांना बाजूला सारत ठाकरे-काँग्रेसचा प्लॅन सुरू आहे की काय अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
संजय राऊतांचा सूर बदलला
कालपर्यंत संजय राऊत हे शरद पवारांनी राज्यसभेत जावं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तिथं घुमला पाहिजे असं म्हणत होते. मात्र, आता त्यांची भूमिका थोडीशी बदलली आहे. राज्यसभेच्या एका जागेवर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं ते म्हणाले.
पवारांना राज्यसेभेसाठी साकडं घालणारे आता बैठकीची भाषा करु लागले आहेत. तर दुसरीकडे, अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यसभा जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये अजून कुठलीही चर्चा झाली नाही. याबाबत व्यापक चर्चा झाली पाहिजे.
इतकंच नाही तर ठाकरेंप्रमाणे, काँग्रेसनंही राज्यसभेच्या एका जागेवर हक्क सांगितला आहे. मविआमध्ये काँग्रेस म्हणून राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, भाजप विरोधात एकत्रित लढणे गरजेचे आहे असं सपकाळ म्हणाले.
आधी ठाकरेंचा दावा.. नंतर काँग्रेसची दावेदारी… यात शरद पवारांच्या पक्षाकडून मात्र अद्याप कोणताही भूमिका नाही. शिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोंगडं भिजत पडलंय.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मविआची बैठक झाली, त्यात ठाकरेंचे चार तर काँग्रेसचे तीन नेते होते. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता नव्हता. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या बैठकीला पवारांच्या नेत्यांनी नसणं, शिवाय, मविआनं जे पत्र सरकारला पाठवलं त्यावरही राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांचं नाव छापलेलं नसणं आणि ऐनवेळी माजी आमदाराचं नाव पेनानं लिहिणं… हे सगळं अनेक प्रश्न उपस्थित करुन जात होतं.
आम्ही आजूनही एकत्रच आहोत, मिसकम्युनिकेशनमुळे पवारांचे नेते आज सोबत दिसले नाहीत, असं म्हणत मविआच्या नेत्यांनी आधी बैठक आणि नंतर पत्रकार परिषद पूर्ण केली. पण, याच पत्रकार परिषदेत जेव्हा शरद पवारांच्या राज्यसभेवरुन प्रश्न विचारला, तेव्हा मात्र ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एक सूरात विषय बदलला.
हेच नेते 16 मार्चला त्यांच्या विधिमंडळात राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत. त्यांच्या मते राज्यसभेच्या निवडणुकांचा आणि अधिवेशनाचा काहीही संबंध नाही. मात्र राज्यसभेबाबत काय बोलायच यावर काँग्रेस आणि ठाकरेंचं एकमत झाल्याचं दिसतंय. त्यातच उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशीही चर्चा केल्याचं समजतंय.
आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात होणाऱ्या सात राज्यसभेच्या जागांपैकी 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांचा कोटा आहे. म्हणजेच काय तर 37 आमदारांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं तर एक जागा पक्की. आता ठाकरेंचे 20 आणि काँग्रेसचे 16 मिळून होणारा आकडा आहे 36. त्यात एखाद्या अपक्ष आमदारानं मत दिलं तर ठाकरे-काँग्रेसला पवारांशिवाय एक जागा मिळू शकते.
सगळा खेळ आकड्यांचा असला तरीही मविआकडे शरद पवारांच्या नावानं सर्वमान्य पर्याय होता. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांमुळे काँग्रेसनं आधीच स्पष्ट भूमिका घेतली. त्यानतर आदित्य ठाकरेंनीही आपल्या खासदारांची नावं घेतं संख्याबळानुसार राज्यसभेवर दावा ठोकला. त्याचाच फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी थेट ठाकरेंच्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत,
यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की, “सत्ता दिसली की भाऊ-मित्र विसरायचे, हीच उद्धव ठाकरे यांची परंपरा आहे. शरद पवारांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरेंना बाजूला करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटातील धूर्त राजकारण हे आदित्य ठाकरेंनी ओळखलं.”
विरोधकांना ठाकरेंच्याच पक्षात जरी दोन सत्ताकेंद्रं दिसत असली तरीही काँग्रेस-ठाकरे हे समीकरण कायम राहिलं तर मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्येही पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय एक जागा जिंकण शक्य होणार आहे. तशी आकडेवारीही आहे.
विधान परिषदेत एका आमदारासाठी 29 मतांचा कोटा आहे. ठाकरे-काँग्रेस मिळून ही एक जागा नक्कीच जिंकू शकतात आणि त्याच जागेवर काँग्रेसनही उद्धव ठाकरेंनाच साकडं घातलं आहे. म्हणजेच काय तर काँग्रेसनं विधान परिषदेचा मुद्दा मार्गी काढत राज्यसभेची दावेवारी आणखी पक्की केली. पण, त्यांच्या दावेदारीनं मविआत राज्यसभेच्या एका जागेवरुन सुरू असलेली रस्सीखेच उघड झाली.
असं असलं तरीही गेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर क्रॉस व्होटिंगच्या निवडणुकीत गेल्या दोन्ही वेळा सर्वात मोठा धक्का काँग्रेसलाच बसला होता. त्यामुळेच पवारांना सोबत घेण्यापेक्षाही 16 मतं बाद न होवू देणं आणि तीही ठरलेल्याच उमेदवाराला जाणं हे काँग्रेस आणि मविआसमोरचं आव्हान असणार आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.