ममता बॅनर्जींच्या 22 मंत्र्यांचा पराभव

महत्वाचे विभाग सांभाळणाऱ्या मंत्र्यांना दणका

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत केवळ तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभ झाला, असे नव्हे, तर ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनाही पराभवाचा फटका बसला आहे. त्यांच्या 35 मंत्र्यांपैकी 22 पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांकडे महत्वाचे आणि मलईदार विभाग होते, त्यांना जनतेने धडा शिकविला, असे दिसून येत आहे. या निवडणुकीने ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालमधील सलग 15 वर्षे चाललेले शासन अखेरीस संपुष्टात आणले आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत:लाही पराभवापासून वाचवू शकलेल्या नाहीत. त्यांच्या पारंपरीक भवानीपूर मतदारसंघातून 15 हजारहून अधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यांच्याप्रमाणेच गत अनेक महत्वाच्या मंत्र्यांची झाल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनावर जनतेची नाराजी

निवडणुकीच्या भाषेत पराभूत मंत्र्यांची संख्या 40 टक्के असेल, तो मोठा नैतिक पराभव मानला जातो जेव्हा 60 टक्के, किंवा त्याहीपेक्षा अधिक मंत्री पराभूत होतात, तेव्हा जनतेचे प्रशासकीय व्यवस्थाच नाकारली आहे, असा त्याचा अर्थ घेतला जातो. ममता बॅनर्जी यांचे 63 टक्के मंत्री जनतेने नाकारले आहेत. याचा अर्थ त्यांच्या प्रशासनात गंभीर त्रुटी होत्या, हे निश्चित झाले. केवळ काही मंत्र्यांचा हा व्यक्तीगत प्रश्नही नाही. तर संपूर्ण प्रशासन जनतेने नाकारले, असा अर्थ आहे.

महत्वाचे मंत्री पराभूत

ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातील अर्थ, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण, ग्रामीण विकास, अल्पसंख्याक कल्याण, परिवहन, कामगार कल्याण, जलसिंचन आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागांचे मंत्री मोठ्या अंतराने भारतीय जनता पक्षाच्या अल्पपरिचित उमेदवारांकडून पराभूत झाले. बॅनर्जी यांनी राज्याचे प्रशासन ज्या मंत्र्यांच्या हाती प्रामुख्याने सोपविले होते, त्यांनाच मोठ्या मतांच्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने तृणमूल काँग्रेसचा हा प्रचंड पराभव अधिकच टोकदार असल्याचे दिसून येते.

सर्व क्षेत्रांमधून पराभव

तृणमूल काँग्रेसचा या निवडणुकीत झालेला पराभव केवळ विशिष्ट क्षेत्रांमधील किंवा स्थानिक नाराजीमुळे झालेला नाही. तर या सरकारच्या विरोधात असणाऱ्या व्यापक आणि राज्यव्यापी नाराजीमुळे झालेला आहे, हे स्पष्ट होत आहे. म्हणूनच जो भाग तृणमूल काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानण्यात आला, तेथेच सर्वाधिक प्रमाणात पराभवाला या पक्षाला तोंड द्यावे लागले. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे…

ड राजधानीचे नगर कोलकाता येथील टॉलीगंज, डमडम, बिधाननगर, भवानीपूर, चौरंगी आदी खात्रीचे शहरी भागांमधील मतदारसंघ या पक्षाने गमावले आहेत.

ड औद्योगिक पट्ट्यातील आसनसोल आणि दुर्गापूर भागात जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठ्या मतांच्या पराभवाला तेंड द्यावे लागले.

ड कृषीसाठी प्रसिद्ध असलेल्या पट्ट्यातील सिंगूर, पूर्बस्थली, साबांग हे भाग गमावले. 2011 मध्ये सिंगूरमधील आंदोलनामुळेच बॅनर्जी प्रसिद्धीस आल्या होत्या.

 

Comments are closed.