‘गरज सरो वैद्य मरो, ‘लाडकी’ आता ‘बोगस’ झाली’; अर्ज मंजूर करणारी सर्वच यंत्रणा सरकारची तरी बोगस

मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा १५०० रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत हाती आलेल्या बोगस आकडेवारीमध्ये सर्वांत जास्त पुण्यातील आकडेवारी असल्याचं समोर आलं आहे. यानंतर आता त्यांना मिळणारा योजनेचा लाभ बंद करण्यात आलला आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांनी सोशल मिडीयावरती पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,  “लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी, अर्ज तपासणारी, अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या, तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडक्या बहिणीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जेष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज असल्याची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक असून यावरून #लाडकी_बहीण योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती, हेच यातून सिद्ध होते.”

“#गरज_सरो_वैद्य_मरो याप्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुका होताच या सरकारला परकी वाटायला लागली असून एक ना अनेक कारणं काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्याचे काम महायुती सरकारने चालवले आहे. आपल्या राजकीय स्वार्थापायी अगोदर बहिणींना लाडकं म्हणायचं आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचं हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि १५०० चे २१०० ₹ करण्याचे दिलेले आश्वासन अमलात आणावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाहीत”, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी

२६ लाख ३४ हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’मध्ये शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते. एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात १ लाख, २५ हजार ३००, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख २५ हजार ७५६, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ मंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात एक लाख, ८६ हजार ८००, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख, ४ हजार ७००, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख १४०० तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यात एक लाख १३ हजार अपात्र म्हणजेच बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ९५ हजार ५००, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये ६३ हजार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात ७१ हजार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लातूरमध्ये ६९ हजार अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यात १ लाख चार हजार, साताऱ्यात ८६ हजार, सांगलीत ९० हजार, पालघरमध्ये ७२ हजार, नांदेडमध्ये ९२ हजार, जालनामध्ये ७३ हजार, धुळे ७५ हजार, अमरावतीमध्ये ६१ हजार बोगस लाभार्थ्यांनी सरकारची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.