नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चे नाव न दिल्यास विमान उतरू देणार नाही! सार्वपक्षीय कृती समितीचा इशारा

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या फायलीत धूळ खात असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. नवी मुंबईतून विमाने उडण्याची तारीख जवळ आली असतानादेखील विमानतळाच्या नावाची घोषणा झाली नसल्याने यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला दि.बां. चे नाव न दिल्यास तेथे विमान उतरू देणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामकरणाबाबतचा निर्णय जाहीर करा अशी मागणीही आज सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे तसेच इतर प्रश्नांबाबत आज ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 15 दिवसांत बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावे अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच नोटिफिकेशन जारी करावे, अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल, असा इशारा कृती समितीने पत्रकार परिषदेत दिला.
भाजपचा भूमिपुत्रांवर दबाव
दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाणे, रायगड, पालघरमधील लाखो भूमिपुत्रांचा आग्रह आहे. या नावावरून राजकारण करू नये. आंदोलने करू नये यासाठी भाजपच्या नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आम्ही कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही असा इशारा यावेळी संतप्त भूमिपुत्रांनी दिला आहे.
विमाने उडण्याआधी नाव द्या!
दि.बां.चे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला आहे. तो ठराव केंद्र सरकारकडे पाठविला आहे, परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. काही महिन्यात विमाने उड्डाणाला सुरुवात होईल. त्यामुळे विमाने उडण्याआधी विमानतळाला दि.बां.चे नाव द्या अशी भूमिपुत्रांची ठाम मागणी आहे.
Comments are closed.