तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती राहिलं धुपाटणं…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडलं?
पुणे: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती राहिलं धुपाटणं अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCPSP)शरदचंद्र पवार पक्ष यांच विलीनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे अनेक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश न करताच उभे करण्यात आले होते. राज्यातील किंबहुना देशातील ही पहिली वेळ असेल जिथ एका पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळ यावर उभे देखील केले. (NCP)
मूळ पक्षाशी कायमचा संबंध संपला?
महत्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आले. मात्र आता निवडून आल्यानंतर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्याने त्यांचा त्यांच्या मूळ पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी कायमचा संबंध संपला आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोअर कमिटीतील नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडून आल्या आहेत, त्यामुळे त्यांचा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंध संपला आहे. याहून इंट्रेस्टिंग उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक बापू पवार यांची पत्नी शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगण फराटा वडगाव रासाई जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर निवडून आल्या आहेत.
त्या निवडून याव्या यासाठी खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार यांनी घड्याळ चिन्हाचा जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळाला, मात्र ज्यांचा प्रचार केला त्यांचाच आपल्या पक्षाशी संबंध संपल्याच समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची स्टोरी तर त्याहून इंट्रेस्टिंग आहे. शशिकांत शिंदे यांचा खासदारकीला १ वेळा विधानसभेला २ वेळा व जिल्हा बँकेला १ वेळा असा सलग ४ वेळा पराभव करण्यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता याचा बदला घेण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधत कोरेगाव आणि सातारा जावळी मतदार संघात जोरदार प्रचार केला आणि त्याचा परिणाम कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ९ गटापैकी मध्ये ६ जागा जिल्हा परिषदेच्या मिळाल्या तर पंचायत समितीच्या तालुका स्तरावर केला तर १२ पैकी ९ जागा प्रचंड मतांनी निवडून आल्या आहेत. याठिकाणी महेश शिंदे यांना अवघी १ जागा मिळाली. यामुळे शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात जोरदार वेलकम झालं अशी चर्चा असताना त्यांचा हा आनंद अल्पकाळ ठरला आहे कारण सर्व विजयी उमेदवार तांत्रिकदृष्ट्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत.
दोन्ही पक्षातील नेते काय म्हणाले?
अजितदादा जिवंत होते, तेव्हा आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा दादांच्या आदेशानेच हे सगळे कार्यकर्ते जे तूतारीचे होते ते घड्याळ चिन्हावर लढले,, दादांचा आदेश हा अंतिम आदेश होता, त्यांची इच्छा ही अंतिम इच्छा होती, आता ते लढले निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता ज्या पक्षातून ते आलेले आहेत, त्या पक्षाने त्यांची काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे असं रोहित पवार म्हणालेत.
ज्या ठिकाणी तुतारी आणि घड्याळ एकत्रित लढले त्या ठिकाणचे नेते मंडळी आहेत, त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. आता आपण पाहतो, अनेक वेळा अशा काही युती होतात, आता चंद्रपूरमध्ये पाहिलं तर ठाकरेंची युती भाजप सोबत झालेली आहे. त्या ठिकाणची कशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला पाहून निर्णय घेतला जातो, साधारणता त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील ते व्यवस्थित निर्णय घेतील, असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे.
जे घड्याळावरती लढून निवडून आले, जे शरद पवारांच्या पक्षांमध्ये होते, त्यांचं भवितव्य काय असेल? या प्रश्नावर उत्तर देताना नरहरी झिपवळ म्हणाले की, त्यांनी निर्णय घेताना कोणाच्या सांगण्यानुसार घेतला असेल काय काही असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे लोक सहकार्य करतीलच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.