पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार अन् आता संकट दिसू लागले का? रोहिणी खडसेंची टीका

रोहिणी खडसे जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (10 मे रोजी) आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले. आता संकट दिसू लागले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Rohini Khadse on Narendra Modi)

राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, देशातील जनतेला आवाहन केले आहे की वर्षभर परदेश प्रवास बंद करा, वर्षभर सोने खरेदी करू नका, पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा, ऑनलाइन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल मीटिंग सुरू करा. हे आवहान म्हणजे ‘करून करून भागले आणि देव पूजेला लागले’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

Rohini Khadse: निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असतो तो बंद करा, सामान्य जनतेनेच सगळे पाळावे का?

मर्यादाच घालायची आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला, सगळ्या मंत्र्यांसाठी जे व्हिआयपी कॉनव्हाय वापरले जातात त्यांच्यावर घाला, त्यांनाही पब्लिक ट्रन्सपोर्टने फिरायला सांगा, निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असतो तो बंद करा, लाखो रुपयांचे कपडे घालणे बंद करा, प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणे बंद करा, आमदार-खासदार खरेदी करण्यासाठी जे पैसे वापरता त्यावर आळा घाला, हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता तो आधी बंद करा, असा प्रती सल्ला त्यांनी दिला आहे. सामान्य जनतेनेच का सगळे पाळावे? असा प्रश्न त्यांनी शेवटी विचारला आहे.

Rohit Pawar: पंतप्रधान आधी भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला सांगण्याची गरज

दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले तेतेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी साहेबांनी देशाला दिला. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेएल. आता भाजपाने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका तर झाल्या आहेत, त्यामुळं ‘निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असं आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका. भ्रष्टाचार करु नका. उधळपट्टी करु नका. अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका. अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करु नका. हे भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही. असेही रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळं देश अडचणीत येऊ नये यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखलं तर सरकारवर कुणी टीकाही करणार नाही आणि देशही अडचणीत येणार नाही. आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते. असेही रोहित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.