‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी; चाकणकरांबाबत राष्ट्रवादीची ‘वेट अँड वॉच’ भूमिका, वर
मुंबई: नाशिकचे वादग्रस्त ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरण आणि त्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे जोडले जाणारे नाव, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांची येत्या दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत चाकणकर यांची बाजू ऐकून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यत्वे खालील मुद्द्यांवर खल होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा नेमका किती आणि कसा सहभाग (Involvement) आहे, याची शहानिशा पक्षपातळीवर केली जाईल. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई करण्याऐवजी, स्वतः रुपाली चाकणकर यांचे या प्रकरणावर काय म्हणणे आहे, हे वरिष्ठ नेते जाणून घेतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ हे केवळ राजकीय हेतुने प्रेरित आहेत की त्यात तथ्य आहे, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
‘केवळ आरोपांवरून राजीनामा का?’ – वरिष्ठ नेत्याचा सवाल
पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते म्हणाले, “राजकारणात प्रत्येक वेळी आरोप होत राहतील आणि जुने-नवे फोटो समोर येत राहतील. पण केवळ फोटो आले किंवा कोणी आरोप केले म्हणून तातडीने राजीनामा घ्यायचाच का? आरोपांची सत्यता आणि कायद्याच्या चौकटीत झालेली चौकशी यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.” या दोन दिवसांतील बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांच्या राजकीय भविष्याबाबत किंवा त्यांच्या पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय? फिर्यादीत काय म्हटले?
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोण आहे कॅप्टन अशोक खरात ?
अशोक खरात हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेवेत होता. २२ वर्षे सेवा बजावल्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने १५४ देशांमध्ये प्रवास केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी खरात, तर सदस्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर अंक शास्त्र अन् ज्योतिषी म्हणून व्यवसाय सुरू केला. राज्यातील मोठे मंत्री खरातकडे ‘भविष्य’ जाणून घेण्यासाठी येऊ लागल्याने सर्वत्र तो चर्चेत आला. खासगी विमानाने प्रवास करण्यापासून त्याची ‘लॅव्हिश लाइफस्टाइल’ अनेकांना चक्रावून टाकणारी होती.
आणखी वाचा
Comments are closed.