आसाममध्ये फक्त कमळ फुलते
राज्यात हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारची जादू कायम
आसाममध्ये भाजपने जोरदार पुनरागमन केले आहे. येथे भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत दिसत आहे. 126 जागांच्या आसाम विधानसभेत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे, तर काँग्रेस खूप मागे राहिली आहे. या भाजपच्या विजयाचे शिल्पकार म्हणून हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, आसाममध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याची आणि तो यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारण्याची ही पहिली वेळ नाही. ते 2016 पासून हे करत आहेत. त्यांना 2021 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच गळ्यात नेतेपदाची मळ पडणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
विधानसमा निवडणूक सभांमध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्याबद्दल जनतेने दाखवलेले प्रेम आणि आपुलकी यावरून त्यांच्या विजयाची तीव्रता लक्षात येत होती. एक्झिट पोलनेही भाजपच्या हॅटट्रिककडेच निर्देश केला होता. मात्र, काँग्रेसची स्थिती इतकी खालावेल याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. हिमंता बिस्वा सरमा यांनी ही निवडणूक एकतर्फी बनवल्यामुळे राज्यात ‘कमळा’लाच बहर आल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्र्यांचा दांडगा जनसंपर्क
हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वत:ला एक जनतेचा नेता म्हणून यशस्वीपणे स्थापित केले. आपल्या कार्यशैलीतून, लोकांपर्यंत पोहोचून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्या सोडवून सरमा यांनी जनतेशी एक नाते निर्माण केले. जेव्हा नेता आणि मतदार यांच्यात नाते निर्माण होते, तेव्हा समस्यांचे वादळही ते तोडू शकत नाही. आसाममध्ये नेमके हेच घडले. काँग्रेस पक्षाने हिमंता सरमा यांच्याबद्दल खूप गाजावाजा केला, पण जनतेने या गाजावाजाकडे दुर्लक्ष करताना मुख्यमंत्र्यांसोबतच्या आपल्या नात्याला प्राधान्य दिले. याचा परिणाम म्हणजे भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले. इतकेच नाही, तर शर्मा यांनी आपल्या कार्यशैलीनेही जनतेला यशस्वीपणे प्रभावित केले. पंतप्रधान मोदींप्रमाणेच, ते सरकारी योजनांची पाहणी करण्यासाठी रात्री-मध्यरात्री हजर होत असत. तक्रारींवर तात्काळ कारवाई करत सरकार जनतेसाठी 24/7 उपलब्ध असल्याची दखल त्यांनी वेळोवेळी घेतली होती.
आसामी ओळख
हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वत:ला आसामी अस्मितेचे रक्षक म्हणून सादर केले. हिंदुत्ववादी सरकार का आवश्यक आहे आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एका विशिष्ट समुदायाला अनुकूलता दर्शवणारा पक्ष सत्तेवर आल्यास काय संभाव्य नुकसान होऊ शकते, हे त्यांनी लोकांना समजावून सांगितले. त्यांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यांसारख्या मुद्यांना आसामच्या अस्मितेसाठी धोका असल्याचे वर्णन केले. बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी स्थानिक एकतेच्या गरजेवर त्यांनी भर दिला. यामुळे हिंदू मतदारही भाजपकडे वळले.
काँग्रेस अपयशी
हिमंता बिस्वा सरमा यांच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यात काँग्रेस अपयशी ठरली. जेव्हा जेव्हा सरमा धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलले, तेव्हा हिमंता बिस्वा सरमा यांनी त्याला मुस्लीम तुष्टीकरण असे संबोधले. या निवडणुकीत काँग्रेससमोर अल्पसंख्याक समुदाय, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यांबाबत मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये आणि राहुल गांधींच्या सभेत जमलेली प्रचंड गर्दी यामुळे असे वाटत होते की, काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या जवळपास पोहोचली नाही तरी तिची कामगिरी निश्चितच सुधारेल. पण निकालांवरून काँग्रेसने प्रगती करण्याऐवजी अधोगती झाल्याचेच स्पष्ट झाले आहे.
चहाच्या मळ्यांवर नियंत्रण भाजपचे पोषक
आसाममध्ये सत्तेवर येण्यासाठी चहाच्या मळ्यांमधील कामगारांना आपल्या बाजूने वळवण्यात हिमंता बिस्वा सरमा यशस्वी झाले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवल्यामुळे या कामगारांची मते भाजपच्या बाजूने वळली. गेल्या 200 वर्षांपासून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना जमिनीचे हक्क देण्यासाठी ‘आसाम भूधारण कमाल मर्यादा निश्चिती (सुधारणा) कायदा, 2025’ लागू केल्याचा मोठा फायदाही भाजपला झाला. राज्य सरकारने चहाच्या मळ्यांमधील कामगारांची घरे असलेल्या जमिनीची आणि राज्य सरकारने मळेमालकांना भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीची मालकी कामगारांना देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. या एकाच कायद्याने चहाच्या मळ्यांमधील कामगारांच्या मनात भाजपबद्दल एक विशेष स्थान निर्माण केले आहे. काँग्रेसने या कायद्याबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या होत्या, परंतु कामगारांच्या आशा या शंकांपेक्षा अधिक प्रबळ ठरल्या.
काँग्रेसच्या कमकुवत बाजू
काँग्रेसने गौरव गोगोई यांना आपला नेता बनवून निवडणूक लढवली. गोगोई यांची प्रतिमा तुलनेने स्वच्छ असली तरी हिमंता बिस्वा सरमा यांच्याप्रमाणे स्वत:ला तळागाळातील नेते म्हणून सादर करण्यात अयशस्वी ठरले. शिवाय, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सरमा यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपांमुळेही काँग्रेसच्या विरोधात वातावरण फिरले. आरोप केल्यानंतर अटक टाळण्यासाठी खेडा यांनी वारंवार न्यायालयात केलेल्या युक्तिवादांमुळे आरोपांच्या सत्यतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खेडा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असते आणि गौरव गोगोई यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता, तर सरमा अडचणीत आले असते. काँग्रेसचा संपूर्ण निवडणूक प्रचार हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर केंद्रित होता. राहुल गांधींपासून ते जवळपास प्रत्येक नेत्यापर्यंत सरमा हे त्यांच्या भाषणांचे केंद्रबिंदू होते. साहजिकच, अशा परिस्थितीत त्यांनी काँग्रेसला पर्याय म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.
जोरहाटमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव, भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी पुन्हा विजयी
आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गौरव गोगोई यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार गौरव गोगोई यांनी जोरहाट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. हितेंद्र 23,182 मतांनी विजयी झाले. काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या गौरव गोगोई यांना 46,257 मते मिळाली. दरम्यान, भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ यांना 69,439 मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रणव प्रियंकुश दत्ता यांना केवळ 701 मते मिळाली. सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाचे उमेदवार हेमंत कुमार पेगू यांना 581 मते मिळाली आहेत. या जागेसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी 68,321 मतांनी विजयी झाले होते, तर काँग्रेसचे राणा गोस्वामी यांना 61,833 मते मिळाली होती. मतांचे अंतर खूपच कमी होते. 2016 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती, तर 2011 आणि 2006 मध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता.
Comments are closed.