‘पीएम किसान योजने’चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे

PM Kisan 22th Installment: शेकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा (PM Kisan 22th Installment) हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र आहेत. निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर (PM Kisan Installment) महिन्यात वितरित करण्यात आला होता. सुमारे चार महिन्यांच्या अंतरानंतर आता २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हप्त्याचे वितरण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या अहिल्यानगर जिल्हा येथील असून, या जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे.(PM Kisan 22th Installment)

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता. त्यानंतर २२ व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दिला जाईल, अशी चर्चा होती; मात्र तो मुहूर्त साधता आला नाही.

२१ व्या हप्त्यात राज्यातील सुमारे ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले होते. आता २२ व्या हप्त्यासाठी ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले असून, यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाख २ हजार ५९० शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी (१३ तारखेला) आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता यापूर्वी जानेवारीअखेर वितरित केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७ फेब्रुवारीपूर्वी निधी वितरित केला जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात हा हप्ता देण्यात विलंब झाला.

आता आसाम, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. २१ वा हप्ता दिल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी हा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पहिले पाच लाभार्थ्यांचे जिल्हे कोणते

योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी सर्वाधिक ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९२ हजार ४४१, कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ८६९, तर सातारा जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ६६८ शेतकरी व पुणे जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ७०६ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.