प्रफुल पटेल, तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घायचा होता…; ‘राजकारण लय वंगाळ झालंय’ हे सुनेत्रा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. रोहित पवारांनी म्हटलंय की, अजित पवारांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार ‘कार्याध्यक्षांना’ (प्रफुल पटेल) देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १०. ०३. २०२५ चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष Working President) ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पुढे रोहित पवारांनी बोलताना म्हटलं की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. त्यांच्या दबावामुळे ही पत्रकार परिषद झाली नाही असं मला वाटत माझं जयशी बोलणं झालं नाही. व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचविण्याचं काम सुरु आहे या कंपनीला अपघातानंतर सुद्धा ८० ते ९० कोटी रुपये दिले. राहुल गांधी यांची मी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले जिथे तुला न्याय मिळेल त्या राज्यात तुझी FIR कर त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेलो आणि तिथे झिरो एफआयआर झाला, अशी माहिती देखील रोहित पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे.
आवाज दाबण्याचा प्रयत्न
पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे दिलेले विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘चुकीने बोललो’ असे सांगणे, या घटनाक्रम संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. पण आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकींना सांगायचं आहे, राजकारण लय वगाळ झालं आहे, सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी सांगितलं होत की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघातबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबद्दल बोलत नव्हते. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते त्याचा काय झालं. त्याने पण पत्रकार परिषद घेतली नाही.
क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची मागणी
हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का, आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवून आणले गेले का, याचा तपास करण्यासाठी या प्रकरणाची ‘क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन’ (गुन्हेगारी तपास) व्हावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेद्वारे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
अजित दादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’ (काळी जादू) किंवा संशयास्पद पूजा करण्याचा प्रयत्न झाला होता. यात नाशिकच्या भोंदू बाबाचा समावेश असावा, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठीच हा प्रकार केला गेला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २८ जानेवारी रोजी अजित पवारांचा झालेला अपघात हा खरोखरच अपघात होता की घातपात, याची चर्चा आणि तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.