रांजणगाव तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक वळण, अनैतिक संबंध अन् आईसह दोन मुलांसह जाळलं, हत्येचं गू

पुणे : पुण्यातील रांजणगावमध्ये 10 दिवसांपूर्वी जळलेल्या अवस्थेत तीन मृतदेह सापडले होते, त्याचे गुढ उकलण्यात पोलिसांना (Police) यश आलं आहे. एका 25 वर्षीय महिलेसह तिच्या दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित महिला आणि मुलाची ओळख पटवणं कठिण झालं होतं, मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळाले होते. त्यामुळे, पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर, 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. मृत महिला ही बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून आढळून आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील 33 पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूची विचारपूस करुन आणि 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे.

नातेवाइकाने अनैतिक संबंधातून केले तीनही खून

मृत महिलेच्या नातेवाइकाने हे तीनही खून अनैतिक संबंधातून हे केले असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना 25 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. स्वाती केशव सोनवणे (25, रा. माजलगाव, जि. बीड), स्वराज (3 वर्षे) आणि विराज (1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर, गोरख पोपट बोखारे (36, रा. सदरवाडी, शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली माहिती

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह सापडल्यानंतर मृतांची ओळख पटली नव्हती. ओळख पटवण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात 28 अंमलरदारांची सहा पथके पाठवण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली. तेव्हा, माजलगाव पोलिस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याची समजले. मृत महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळत होते. पतीकडे चौकशी केल्यावर ती आळंदी येथे आई-वडिलांकडे गेल्याची माहिती समजली. आळंदीत चौकशी केली असता, ती तिचा नातेवाईक गोरख याच्याबरोबर गेली असल्याची माहिती मिळाली. मृत स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी आहे. स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये कायम भांडणे होत असत. ही भांडण नेहमी गोरख सोडवत होता. यातून स्वाती आणि गोरखचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

चारच महिन्यांपूर्वी गोरख याने स्वाती आणि तिच्या पतीमधील वाद मिटवला होता. स्वाती आळंदीला आल्यावर तिने गोरखकडे लग्नासाठी तगादा लावला. यामुळे स्वाती आणि गोरख यांच्यात वाद झाले. गोरख स्वातीला आणि दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन 23 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या सामसूम रस्त्यावर रात्री घेऊन गेला. तेथे त्याने स्वातीशी शरीरसंबंध ठेवल्यावर पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाले. दोन्ही मुलं झोपेत असताना, गोरखने स्वातीचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून तिला संपवलं. झोपेतून उठलेल्या विराज आणि राजचाही गळा आवळून खून केला. मृतदेहांची ओळख पटू नये, म्हणून त्याने महामार्गावरील एका पेट्रोलपंपातून पेट्रोल आणून तिघांच्याही मृतदेहावर टाकले आणि आग लावली, त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तो नेहमी प्रमाणे रांजणगाव येथील एका कंपनीमध्ये गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला.

250 सीसीटीव्ही, 16500 भाडेकरू तपासले

मृतदेह अर्धवट जळालेले असल्याने तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या, यासाठी आजूबाजूला सीसीटीव्ही चेक केले, जास्त प्रमाणावर काही माहिती उपलब्ध नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. यासाठी संपूर्ण राज्यभरात पथके रवाना करण्यात आली होती. तसेच, 250 सीसीटीव्ही आणि 16 हजार 500 भाडेकरू तपासण्यात आले. चाकण, तळेगाव, रांजणगाव, सुपा आदी एमआयडीसीतील कामगारांकडे चौकशी केली. मृतदेहाच्या हातावरील गोंदवलेल्या नावाच्या आधारे बँकांकडून खातेदारांची माहिती घेण्यात आली. तर, आशा वर्कर आणि आरोग्य विभागातील सेविकांकडून लहान मुलांच्या अनुषंगाने माहिती घेण्यात आली.

आणखी वाचा

Comments are closed.