राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना पुणे पोलीस कच खातात; महिला पोलिसाचा विनयभंग, तरीही अटक नाही
पुणे : एरवी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारे पुणे (पुणे) पोलीस राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना करताना मात्र कच खातात का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पुण्यात समोर आलेल्या दोन घटना. एका महिला पोलीस निरीक्षकाने भाजपचे पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरेंनी विनयभंग केल्याची तक्रार केलीय तर दुसऱ्या घटनेत महापालिकेतील महिला अधिकाऱ्याने ओंकार कदम या भाजपच्याच पदाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिलीय. दोन्ही प्रकरणात पुणे पोलिसांनी (Police) गुन्हा तर दाखल केलाय. मात्र आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही .
23 जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील काही रस्त्यांची पाहणी करणार असल्याने भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शनिवार वाड्याच्या परिसरात उपस्थित होते. मंत्री महोदयांना येण्यास वेळ लागणार असल्याने आमदार रसानेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही चहासाठी येण्याची विनंती केली. मात्र, सर्वजण चहा घेत असताना प्रमोद कोंढरे महिला पोलीस निरीक्षकाच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. या महिला पोलीस निरीक्षकांनी केलेल्या दाव्यानुसार कोंढरेंनी दोनवेळा त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असा स्पर्श केला. त्यानंतर महिला पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मिळवलं आणि झालेला प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर घातला. त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोंढरे यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र कोंढरेंना अटक करण्यात आली नाही. पुणे पोलिसांची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप महिला संघटनांनी केलाय.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभगातील एका महिला अधिकाऱ्याने देखील भाजपच्या कामगार विभागाचा पदाधिकारी असलेल्या ओंकार कदमकडून दीड वर्षांपासून छळ होत आल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली. ओंकार कदम त्याच्या साथीदारांसह कार्यालयात येऊन द्विअर्थी बोलत असल्याचं, अरे तुरे ची भाषा वापरात असल्याचं या महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटलं. राज्याच्या महिला आयोगाकडे देखील या महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. मात्र, माध्यमांनी या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर ओंकार कदमविरुद्ध पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ओंकार कदमलाही अटक करण्यात आली नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. दोन्ही प्रकरणांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या शिक्षेची तरतूद असल्याने अटकेची गरज वाटत नसल्याचं कारण पुणे पोलीस खासगीत देत आहेत. मात्र, हे कारण कारवाई टाळण्यासाठीची पळवाट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून कारवाईचा देखावा?
एरवी विनयभंगाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस आरोपींना अटक करतात. मात्र, इथे एका महिला पोलीस अधिकाऱ्यानेच तिचा विनयभंग केल्याची तक्रार केलीय. मात्र तरीही फक्त गुन्हा दाखल करून प्रकरण शांत होण्याची वाट पहिली जात असेल तर याला दुर्दैव नाही तर काय म्हणणार ? कायदा आपलं काम करतो आहे, याची खात्री असेल तरच सामान्यांना समाजात सुरक्षित वाटतं. सुरक्षिततेची ही खात्री पोलिसांनी कृतीतून द्यायची असते. मात्र, दोन्ही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलीय की कारवाईचा देखावा असा प्रश्न विचारला जातोय .
पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
दरम्यान, कारवाई करणं वेगळं आणि पोलिसांनी कारवाईचा देखावा निर्माण करणं वेगळं. एका महिला पोलीस निरीक्षकांसोबत असा प्रकार घडत असले आणि तरीही पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल किंवा न केलेल्या कारवाईबद्दल सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील तर हे प्रश्न पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर घेतले जातायत हे नक्की.
हेही वाचा
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आणखी वाचा
Comments are closed.