राहुल गांधींनी दक्षिण पश्चिम नागपूरमधून फडणवीसांविरोधात निवडणूक लढवावी; भाजप आमदाराचं ओपन चॅलें

राहुल गांधी: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका दैनिकात लेख लिहून नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावरच आरोप करत, मतदार यादीतील अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत मतदारांची संख्या तब्बल 8 टक्क्यांनी वाढली, असा आरोप त्यांनी केला आहे. आता राहुल गांधींच्या आरोपावर भाजपकडून (BJP) जोरदार पलटवार करण्यात आलाय.

राहुल गांधींच्या आरोपावर भाजप आमदार परिणय फुके म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धक्का त्यांना बसला. जेव्हा राहुल गांधी पराभूत होतात, तेव्हा ते अशीच टीका करतात. कर्नाटक, तेलंगणा विधानसभा तसेच महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत ते जिंकले तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगावर कोणतीही टीका केली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यावर त्यांनी टीका करणे सुरू केले आहे. सुरुवातीला ईव्हीएमवर आरोप केले, नंतर सहा वाजता नंतरच्या मतदानावर त्यांनी आरोप केले. याआधी कामठी मतदारसंघाबद्दल आरोप केले आहे. आता दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघाबद्दल ते आरोप करताय. दक्षिण पश्चिममध्ये 8 टक्के मतदान वाढल्याचा आरोप ते करत आहे. मात्र लोकसभेच्या तुलनेत सर्वत्र मतदान वाढले, त्यामागे अनेक कारणे आहेत, असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधींनी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवावी

परिणय फुके पुढे म्हणाले की, लोकसभेत भाजप आणि मोदींच्या जागा कमी झाल्याबद्दल लोकं सावध झाले आणि मतदान वाढले. या प्रकारचे वक्तव्य करण्याऐवजी राहुल गांधी यांनी आमचे चॅलेंज स्वीकारावे. एकतर त्याची कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, नाही तर त्यांनी दक्षिण पश्चिम नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवावी. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय राहणार नाही, असे खुले आव्हान त्यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून आले, त्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत मतदार यादीत तब्बल 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. काही बूथवर ही वाढ 20 ते 25 टक्क्यांपर्यंत झाली आहे. “काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी (BLO) अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली असून, पडताळणी न झालेल्या पत्त्यावर हजारो मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत,” असे म्हटले. राहुल गांधी यांनी हे सर्व प्रकार सुरू असताना निवडणूक आयोग गप्प का आहे? की तो यामध्ये सहभागी आहे? असा सवाल देखील उपस्थित केलाय. तर “मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ प्रसिद्ध करावं,” अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.

काय म्हणाले काँग्रेसचे पराभूत उमेदवार?

दरम्यान, लोकसभेनंतर 5 महिन्यात नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 33 हजार 712 मतदारांची वाढ झाली. बीएलओ यांना नवीन मतदारांची नोंदणी करतांना त्यांच्या घराची पडताळणी करणे गरजेचे असताना, मात्र  ती पडताळणी झाली नाही. नवीन मतदारांची नोंदणीची एक प्रक्रिया असते. मात्र, ती पूर्ण न करता भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोग यांच्या संगनमताने ही मतदार नोंदणी केली, असा दावा काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी केला आहे. माहिती अधिकारात आम्ही माहिती घेतली असता, एका मोबाईल क्रमांकावरून शंभर नवीन मतदारांची   नोंदणी केल्याचे पुढे आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला यासंदर्भात  कुठलीही माहिती देत नाही. आमचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, याची आम्हाला अपेक्षा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=jcy-kxvnpzs

आणखी वाचा

Rahul Gandhi on Election Commission: ज्याचं उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत आहेत याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग; 45 दिवसात डेटा डिलीटवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं

आणखी वाचा

Comments are closed.