ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा; हात तोडला नाही तर बघा, स्वामी आनंद स
राज ठाकरे उधव ठाकरे विजय रॅली: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं आहे. त्यानंतर आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंवर वादग्रस्त टीका केली आहे.
मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा-
स्वामी आनंद स्वरुप एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले की, मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुले आव्हान देत आहे. मी लवकरच मुंबईत येईन आणि तिथे उभा राहून हिंदीत बोलेन, बघूया कोण मला थांबवते, असं आव्हान स्वामी आनंद स्वरुप यांनी दिलं आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा, हात तोडून नाही टाकले तर बघा, असं विधान काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी केलं आहे. त्यामुळे स्वामी आनंद स्वरुप यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार; संदीप देशपांडेंचा इशारा
आज ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार असा इशारा दिला. महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले. हिंदी भैय्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही त्यांनी सांगितले. मराठीचा अपमान करणाऱ्यांनी एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही कारवाई करू, असाही इशारा देशपांडे यांनी दिला. आज वरळी डोममध्ये संपूर्ण मराठीमय वातावरण असून नेमका कोणता संदेश ठाकरे बंधू या मोर्चातून देणार? याकडे अवघ्या राज्यासह महाराष्ट्राचे लक्ष आहे. दुसरीकडे, सामनामधून ठाकरे बंधूंच्या मिलनावर भावनिक साद घालण्यात आली असून गुजराती जयजयकार करणाऱ्या शिंदेंचा सुद्धा समाचार घेण्यात आला आहे.
आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा-
महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. हेच जीआर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधूंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, जीआर रद्द झाल्याने या मोर्चाचे प्रयोजन संपले होते. तरीही एकत्र येण्याची ओढ लागलेल्या ठाकरे बंधूंनी मोर्चा नाही तर मग विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. या विजयी मेळाव्याला महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. परंतु, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता मविआतील पक्षांकडूनही या विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव ठाकरेच राहतील, असे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
https://www.youtube.com/watch?v=tekifw5v3vw
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.