नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

नसरापूर बलात्कार प्रकरणावर संजय राऊत नसरापूर येथील चार वर्षांच्या लहान मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच आरोपी करायला हवे. तसेच राज्य सरकारवर खटला चालवून, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. महिला अत्याचाराची ही राज्यातील काही पहिलीच घटना नाही. देवेंद्र  फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून महिलांवरील अत्याचार, हत्या या घटना वाढल्या असून कायदा व सुव्यवस्थेचं वाटोळं झालं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics News)

देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे कारण ते गृहमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडत नाहीत. त्यांच्या काळात सातत्याने लहान मुलींवर अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. महिला अत्याचारांचे प्रमाणही वाढीला लागले आहे. तरीही आमचे मुख्यमंत्री टिवल्या-बावल्या करत, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू याठिकाणी प्रचार करत फिरतात. राज्याची अवस्था कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गंभीर आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 24 तास राजकारणात अडकले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी झालेल्या ट्रॅफिक जॅमनंतर देवेंद्र फडणवीस यांनी विनम्रपणे माफी मागितली. पण त्यांनी कालच्या नसरापूरच्या प्रकरणात माफी मागायला पाहिजे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांबाबत आणि गृहमंत्री म्हणून अपयशाबद्दल त्यांनी एकदा तरी माफी मागायला हवी. कदाचित पिडीत मुलीची आई सरकारची लाडकी बहीण असतील, तिला महिन्याला 1500 रुपये मिळत असतील. पण त्या मोबदल्यात लाडक्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा अधिकार दिलाय का? तिने आम्ही देतो त्या 1500 रुपयांच्या मोबदल्यात तोंड बंद करावं, अशी सरकारची अपेक्षा आहे का? या महाराष्ट्रातील माता-भगिनींनी सरकाविरोधात बंड केले पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut: सरकारचा एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

हे राज्य सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेले नाही. सत्ता, पैशांची मस्ती या बळावर राज्य चाललं आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे नराधमांना अत्याचार करायची हिंमत येते. काल सरकारने नवले पूलावर नसरापूरच्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. जनतेने हे सरकार ताब्यात घेतले पाहिजे. हे सरकार, गृहमंत्री आणि पोलीस आरोपी असायला पाहिजेत. या राज्य सरकारवरच खटला दाखल केला पाहिजे.  सरकारचा एन्काऊंटर केला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस

आणखी वाचा

Comments are closed.